RAMESH UBALE

32 वर्षापुर्वी घरातून निघून गेलेल्या चुलत्याला पुतण्यांनी आणले शोधून

न्यूज ऑफ द डे बीड

– बीडच्या चर्‍हाटा CHARHATA येथील घटना
बीड, दि.14 : सोशल मीडियाचा जर चांगला वापर केला तर तो किती फायद्याचा ठरू शकतो याचं एक चांगलं उदाहारण बीड तालुक्यातील चर्‍हाटा गावच्या ग्रामस्थांना दिसून आलं आहे. त्याचं झालं असं की 32 वर्षापुर्वी कामाच्या शोधात घरातून निघून गेलेल्या चुलत्याला त्याच्या पुतण्यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओने सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून शोधून आणले आहे. त्यामुळे आज त्यांची 2 भावांसह बहिणींची भेट घडून आली आहे.

रमेश माणिकराव उबाळे RAMESH MANIKRAO UBALE हे वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे 1991ला पैसे कमवण्यासाठी आपले भाऊ, बहीण, आई, नातेवाईकांना सोडून मुंबईला गेले. मात्र ते रेल्वेने थेट पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे पोहोचले. तेथे त्यांनी कृष्णा नावाच्या हॉटेलमध्ये काम सुरू केले तर ते आजतागायत तिथेच काम करत राहिले. तब्बल 32 वर्ष ते एकाच हॉटेलमध्ये राहिले. इकडे भाऊ नारायण उबाळे यांनी दोन वेळा बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली, परंतु भावाचा शोध लागला नाही. अखेर कोल्हापूर येथील प्रकाश पानसरे नामक व्यक्ती मदतीसाठी धावून आला.

पानसरे यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून ते जेवणासाठी कृष्णा हॉटेलवर थांबले होते. त्यांनी विचारपूस केली असता उबाळे यांनी ते बीड जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. त्यांनी रमेश उबाळे यांचा एक व्हिडीओ तयार केला. गुगलवरून चर्‍हाठा गाव शोधले आणि शेवटी त्यांना एका पान टपरीचा संपर्क मिळाला. टपरी चालकाला फोन करून त्याच्या व्हॉट्सपवर तो व्हिडीओ पाठवला. टपरी चालकानेही लगेच गावातील ग्रुप आणि सर्व उबाळे नावाच्या लोकांपर्यंत तो पोहोचवला.
हा आपलाच भाऊ असल्याचे खात्री पटताच उबाळे बंधूंनी पानसरे यांना संपर्क करून हॉटेलचा पत्ता मिळवला. हॉटेल चालकाशी बोलून पोलिसांनाही कल्पना दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष उबाळे यांनी पत्र दिल्यावर लगेच दत्ता व कैलास उबाळे हे दोन पुतणे चुलत्याला आणण्यासाठी रवाना झाले. त्यांनी चुलते रमेश उबाळे यांना सोबत घेत मध्यरात्री 1 वाजेला आपलं गाव गाठलं. परंतु अगोदर ते बीड शहरातील त्यांच्या बहिणीच्या घरी गेले आणि यावेळी वृद्ध झालेल्या बहिणीला आईने तुझी खूप वाट पाहिली, असं म्हणत अश्रू अनावर झाले. याविषयी भावांनी देखील आपली प्रतिक्रिया देत आज आमची खरी दिवाळी आहे. त्यामुळे सर्व कुटुंबातील सदस्य आनंदी असून आनंदोत्सव साजरा करत आहोत, असं म्हणाले.
30 वर्षीय पोलीस दलात काम करणारे त्यांचे पुतणे म्हणाले की, माझ्या जन्मापूर्वी माझे चुलते गाव सोडून गेले होते. माझे वडील आज हयात नाहीत. मात्र, आज माझे चुलते आल्याने मला त्यांच्या रूपाने वडील आल्याचं जाणवत आहे.

 

Tagged