किराणा उधार न दिल्यामुळे सतत त्रास,दुकानदाराने घेतला गळफास!

क्राईम धारूर न्यूज ऑफ द डे परळी


धारुर तालुक्यातील कान्नापूर येथील घटना, तिघांवर गुन्हा दाखल
सिरसाळा
दि.25 : उधारीवर किरणा साहित्य न दिल्यामुळे एका किराणा दुकानदाराला सतत त्रास दिला. मानसिक छळ केला, या नैराश्यातून किराणा दुकानदाराने गळफास घेवून आपलं आयुष्य संपवले. ही दुर्देवी घटना धारुर तालुक्यातील कान्नापूर येथे गुरुवारी (दि.24) घडली. या प्रकरणी तिघांवर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश आशोक देशमुख (वय 32, रा.कान्नापूर ता.धारुर) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश यांचे कान्नापूर येथे दुकान आहे. गावातीलच स्वप्नील रामकिशन देशमुख, सुरज रामकिशन देशमुख, सुमित्रा रामकिशन देशमुख यांना अविनाशने किराणा साहित्य उधार दिले नाही. याचा राग आल्याने त्यांनी अविनाश देशमुख यांना सतत त्रास देण्यास सुरुवात केली. त्याचा वारंवार मानिसक छळ केला. या त्रासाला कंटाळून गुरुवारी रात्री अविनाशने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी स्वप्नील रामकिशन देशमुख, सूरज रामकिशन देशमुख, सुमित्रा रामकिशन देशमुख यांच्यावर सिरसाळा पोलीस ठाण्यात मयताचे भाऊ संतोष देशमुख यांच्या फिर्यादीवरून कलम 306, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मयत अविनाशच्या पार्थिवावर दुपारी कान्नापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास उपनिरीक्षक गित्ते करत आहेत.

Tagged