बीड

आष्टी येथून अहमदनगरकडे निघालेल्या रेल्वेच्या पाच डब्यांना लागली आग.

By Shubham Khade

October 16, 2023

बीड : न्यू आष्टी रेल्वेस्टेशनवरून अहमदनगरकडे जाणाऱ्या रेल्वेस नारायण डोहजवळ अचानक आग लागली यात रेल्वेच्या पाच डब्यांना आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेतली. आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती आहे.आष्टी येथून अहमदनगर येथे निघालेल्या रेल्वेला दुपारी ३.३० वा. नारायणडोहच्या पुढे गेल्यानंतर अहमदनगर- सोलापूर मार्गावरील गेट पार करताना अचानक पुढील पाच डब्यांना आग लागली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच आग आटोक्यात आणण्यासाठी अहमदनगर महापालिका कर्मचारी व नागरिकांनी धाव घेतली. काही वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. रेल्वे अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली असून आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.