PANKAJA MUNDE

विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द मी पाळला – पंकजाताई मुंडे

बीड

जाटनांदूर, उंदरखेलमध्ये पंकजाताईंच्या सभांना मोठी गर्दी

जाटनांदूर, दि.18 : शौर्याबरोबरच स्त्रियांमध्ये धैर्यही असते. एखाद्याला एकदा शब्द दिला की, मान कापून देऊ पण शब्द मागे घ्यायचा नाही हे मला मुंडे साहेबांनी शिकवले आहे. आजपर्यंत राजकीय जीवनात असताना मी असंख्य वेळा भाषणे केली; परंतु या भाषणादरम्यान मी केलेले वक्तव्य मला मागे घ्यायची कधीच वेळ आली नाही. मी प्रत्येकवेळी एखाद्या गावात विकासासाठी दिलेला शब्द पाळते. ग्रामविकास मंत्री असताना बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सुरेश धस यांनी त्यांच्या गटातील पाच जि.प. सदस्य मला दिले, तेव्हा बीड जि.प.भाजपाच्या ताब्यात आली होती. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाच्या योजना त्यावेळी राबवता आल्या होत्या. या दरम्यान मी सुरेश धस यांना आमदारकीचा शब्द दिला होता अर्थात त्यामागे त्यांचीही शक्ती होती पण एकदा शब्द दिला की मी मागे घेत नाही, असे प्रतिपादन महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमदेवार पंकजाताई मुंडे यांनी केले.

पंकजाताई मुंडे यांनी प्रचाराचा दुसरा टप्पा आज जाहीर सभांच्या माध्यमातून सुरू केला असून जाटनांदुर, उंदरखेल येथे आज त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आ. सुरेश धस यांच्यासह शिरूरचे नगराध्यक्ष रोहिदास पाटील, विजय गोल्हार, दत्ता काकडे, शैलजा गर्जे, वाल्मिक निकाळजे, अमोल तरटे, वारे मामा, सरपंच सचिन माने, ज्योतीताई दहातोंडे, अरुण भालेराव, रामदास बडे, चंपावती पानसंबळ, हनुमंत डोंगर, राजेंद्र चव्हाण, ज्ञानदेव डोंगर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, लोकसभा निवडणूक एक प्रकारे महायुद्ध आहे आणि हे महायुद्ध आहे म्हणूनच मला उमेदवारी मिळाली आहे. या निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन त्यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी पक्षाने मला उमेदवारी दिली आहे, त्यामुळे मला पाच वर्षे देऊन बघा, जिल्ह्याचं भविष्य उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.



त्या म्हणाल्या, जिल्ह्याच्या विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. दिल्लीत मी आदरणीय मोदीजींना हाक मारली तर बोलो पंकजा’ म्हणून प्रतिसाद देण्यासाठी तुमचे मताधिक्य मला आवश्यक आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मी मते मागत आहे. या जिल्ह्यातील बहाद्दर जनता कायम विकासासोबत चालणारी आहे, याचा मला विश्वास आहे. परभणी, नांदेड लातूर असो की अन्य ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रचारासाठी मला येण्याचा आग्रह धरतात, कारण मी एक सर्व समावेशक चेहरा आहे याची जाणीव त्यांनाही आहे. माझ्यासमोर येणार्‍यांना कधीही त्याची जात विचारत नाही. येणार्‍या प्रत्येकाचे काम माझ्याकडून होईल का, यासाठी मी प्रयत्नशील राहते असे त्या म्हणाल्या.

मागे वळून पहा, मी केलेली कामेच दिसतील
तुम्ही मागे वळून पहा, तुमच्या गावासह वाडी-वस्ती-तांड्यासह ग्रामपंचायतमध्ये जा. तेथील विकास कामे दिसल्यानंतर तुम्हाला पंकजा मुंडेंची आठवण येईल. ज्या गावात मला 50 मते मिळाली आणि ज्या गावात 50 मते बाजूला गेली, तेथेही मी सारखीच विकास कामे केली. मंत्री असताना विकास कामात कधीही भेदभाव केला नाही. समोरचा माणूस कोणत्या पक्षाचा आहे हे मी पाहिले नाही, तर तो आपल्या राज्याचा आणि माझ्या जिल्ह्याचा आहे असे मी मानते. त्यामुळे जिल्ह्याच्या उज्वल भवितव्यासाठी आणि विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी मला निवडून द्या असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

विनाकारण राजकारण आणू नका
पंकजाताई मुंडे यांनी भाषणादरम्यान आरक्षण मुद्द्यावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, ज्या गोष्टी कायद्याने मिळणार आहेत, त्या गोष्टीत राजकारण आणण्याची काहीही गरज नाही. मी कितीही म्हटले तरी कायदा बदलत नसतो. त्यामुळे या निवडणुकीत कृपा करून राजकारण आणू नका, असे आवाहन त्यांनी केले.

खरा विकास पंकजाताईंच्याच काळात -आ.सुरेश धस
याप्रसंगी आमदार सुरेश धस म्हणाले पंकजाताई मुंडे या राज्य मंत्रिमंडळात चार खात्यांच्या मंत्री होत्या. त्यावेळी त्यांनी आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यासाठी प्रचंड मोठा निधी दिला. त्यांच्याच कार्यकाळात संपूर्ण राज्यात 25 हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण झाले. त्यात आपल्या मतदारसंघात सुद्धा गावांसह वाडी- वस्ती-तांड्यापर्यंत रस्त्यांची कामे मार्गी लागली. पंकजाताईंनी लक्ष घालून ही विकासाची सर्व कामे पूर्ण केली, त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. प्रामाणिकतेने विकासाची कामे केली. महिला बालकल्याण मंत्री असतानाही पंकजाताईंनी शिरूर कासार तालुक्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या. पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी केली. ठोस निर्णय घेतले. त्यामुळे 1000 मुलांमागे 628 इतकी अल्प मुलींची असलेली संख्या नंतर वेगाने वाढत गेली. जलसंधारण मंत्री म्हणून काम करताना पंकजाताईंनी ग्रामपंचायत पातळीवर विकासाच्या अनेक योजना राबवल्या. त्याबरोबरच सिमेंट बंधारे, सीसीटी डीपसीसीटी या सर्व कामांना पंकजाताईंनी मंजुरी देत निधी दिला. त्यांनी सातत्याने समाज हिताची कामे केली. त्यामुळे पंकजाताईंना संसदेत जाण्याची संधी द्यावी, असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले. या सभेला जाटनांदूरसह परिसरातील चाहूरवाडी, भिलारवाडी, मोडजळवाडी पोखरवाडी आदी परिसरातील वाडी-वस्ती तांड्यावरील मतदार तसेच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.