MANOJ JARANGE PATIL AND PANKAJA MUNDE

मनोज जरांगे पाटील, पंकजाताई मुंडे एकाच व्यासपीठावर!

बीड

बीड, दि.28 : आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील MANOJ JARANGE PATIL आणि बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे PANKAJATAI MUNDE हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्या दोघांमध्ये यावेळी संवादही झाला. सुरुवातीला पंकजाताई आल्या तेव्हा त्यांना बसायला खुर्ची नसल्याने त्या खालीच बसल्या, तेव्हा स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी स्थानिक संयोजकांना पंकजाताईंना देखील खुर्ची द्यावी अशी सूचना केली. त्याबरोबर संयोजकांनी जरांगे पाटील यांच्या शेजारी पंकजाताईंना देखील बसायला खुर्ची दिली. पंकजाताई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपुसही केली.

मागील काही महिन्यांपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा उभा असलेला लढा व त्यातच महाराष्ट्रासह देशात लागलेली लोकसभेची निवडणूक यामुळे एक वेगळाच तणाव सध्या वातावरणात आहे. परंतु वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर आज संतांच्या ठायी जातीच्या भिंती गळून पडल्याचे पाहायला मिळाले.

पंकजाताई मुंडे यांनी देखील आजपर्यंत कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध केलेला नाही किंवा अशा आरक्षण विरोधी कोणत्याही व्यासपीठावर कधीही पंकजाताई मुंडे गेलेल्या नाहीत. अलीकडच्या काही दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी देखील पंकजाताई मुंडे किंवा धनंजय मुंडे यांच्यावर कधी थेट टिका केलेली नाही.

स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी कधीही एखाद्या विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही किंवा याला मत द्या, असे आवाहन केलेले नाही, इतकेच नव्हे तर पंकजाताई मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांना आम्ही मराठा आरक्षण विरोधी मानत नाही, अशीही जाहीर भूमिका त्यांनी घेतली होती. अशाही परिस्थितीत राजकारणासाठी काही जणांकडून समाजात दुही माजेल असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याला आज या दोघांच्या एकत्र येण्याने उत्तर मिळाले असून हा क्षण नक्कीच दोन्ही समाजातील दुही कमी करणारा आणि सुखावणारा असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर देखील मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण केले जात असल्याचे दिसून येते, त्यामध्ये सबंध बीड जिल्हा ढवळून निघाला असताना आज जरांगे पाटील व पंकजाताई मुंडे यांच्यातील हे क्षण व संवाद हा सुखावणारा होता…