बीड

धारूरच्या चौकात रात्रीतून बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

By DHANANJAY JOGDE

June 14, 2024

सचिन थोरात, धारूर

दिनांक 14 : ऐतिहासिक किल्ले धारूर शहरात मागील दोन दशकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याची मागणी विविध सामाजिक संघटना आणि शिवप्रेमी मधून सातत्याने केली जात होती.परंतु प्रशासनाने अद्याप कायदेशीर मान्यता दिलेली नसल्याने संतप्त शिवप्रेमींनी 14 जून शुक्रवार रोजी पहाटेच्या वेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा चबुतऱ्यावर बसून छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्या.पुतळा बसवण्यात पुढाकार घेणाऱ्या आठ ते दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धारूर शहराला मोठी ऐतिहासिक ओळख आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याची मागणी तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून करण्यात येत होती. प्रशासन या मागणीकडे कायम दुर्लक्ष करत होते. यामुळे शिवप्रेमींच्या मागणीला न्याय मिळत नसल्याने संतप्त शिवप्रेमींनी 14 जून शुक्रवार रोजी पहाटेच्या वेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारूढ

पुतळा क्रेनच्या सहाय्याने बसवला आहे. विशेष म्हणजे पुतळा बसवल्यानंतर पुतळा बसवणाऱ्या तरुणांनी पलायन न करता आम्ही आमच्या दैवताचा पुतळा बसवला आहे असं म्हणत शिवरायांच्या नावाने जयघोष केला. सकाळी पुतळा पाहण्यासाठी चौक परिसरात मोठी गर्दी जमा होत आहे. तसेच पुतळा परिसरात पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे.