सिरसाळा दि.21 : परळी तालुक्यातील जळगव्हाण येथील रत्ननगर तांडा येथील रहिवासी भीमराव शिवाजी राठोड (वय अंदाजे २६) या तरुणाची कौटुंबिक वादातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी अनिल बाबासाहेब चव्हाण याने भीमरावच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल चव्हाण आणि मयत भीमराव राठोड यांच्यात घरगुती वाद होता. हा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता. याच वादातून अनिल चव्हाण याने भीमरावला संपवण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी अनिलने भीमरावला रत्ननगर तांडा, जळगव्हाण येथे बोलावले. त्यांच्यात पुन्हा एकदा याच विषयावर जोरदार बाचाबाची झाली, जी नंतर हाणामारीत परिवर्तित झाली. यावेळी अनिलने जवळच असलेला कोयता उचलून भीमरावच्या डोक्यात अनेक वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भीमरावचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अनिल चव्हाणचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


