बीड : जिल्हा पोलिस दलात अचानक मोठे फेरबदल करण्यात आले असून बीड शहरातील चार महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांतील निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलिस वर्तुळात आणि स्थानिक राजकीय पातळीवर चर्चा रंगू लागली आहे.
या अदलाबदलीत गेवराई, शिवाजीनगर, बीड ग्रामीण आणि पेठबीड या चार ठाण्यांचा समावेश आहे. गेवराई पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांना शिवाजीनगर पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर शिवाजीनगरचे निरीक्षक किशोर पवार यांची गेवराई पोलिस ठाण्यावर बदली करण्यात आली आहे. बीड ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक मारुती खेडकर यांना पेठबीड ठाण्यात हलवण्यात आले असून, पेठबीड ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदिराज यांना बीड ग्रामीण ठाण्यात नेमण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सांगितले की संबंधित ठाणेदारांनी स्वतःच्या विनंतीवरून बदलीसाठी अर्ज केल्यामुळेच या अदलाबदली करण्यात आल्या आहेत. मात्र, या बदल्यांमागे राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा आहे.


