देश विदेश

सोयाबीन बियाणे उगवले नाही; चार तालुक्यात तक्रारींचा पाऊस

By Karyarambh Team

June 21, 2020

बीड : जिल्ह्यात या वर्षी वेळेवर पाऊस झाल्याने शेतकर्‍यांची मागील 8 ते 10 दिवसापासून खरिपाच्या पेरणीची लगबग सुरु झाली असून जवळपास 50 ते 60 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. सोयाबीन पिकाची पेरणीही या वर्षी मोठ्या प्रमाणात सुरु असून बियाणे उगवणी बाबतच्या तक्रारी बीड, परळी, अंबाजोगाई व केज तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत.

मागील वर्षी सोयाबीन काढणीच्या कालावधीत अवकाळी पाऊस झाल्याने बियाणे मोठ्या प्रमाणात भिजलेले होते, अशा परिस्थितीत बर्‍याच शेतकर्‍यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांचे बियाणे खरेदी करून पेरणी केलेली आहे. अशा बियाण्यांच्या देखील उगवण कमी झालेबाबाताच्या बर्‍याच गावातून मागील 2 दिवसापासून तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात येते की, जर आपले बियाणे न उगवल्याबाबत अथवा कमी प्रमाणात उगवलेबाबत आपणास तक्रार करायची असल्यास आपला आपला तक्रार अर्ज आपल्या तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेकडे बियाणे खरेदीच्या पक्क्या पावतीसह सादर करावा. तालुका स्तरावर उपविभागीय कृषि अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली असून या समितीमार्फत प्राप्त तक्रारींची रीतसर चौकशी करण्यात येईल, तक्रारीचे अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, बीड यांचेमार्फत करण्यात आले आहे.