सोयाबीन उगवन तपासणी पथकाची संख्या वाढविण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश
मुंबई : सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी केल्या आहेत. त्याची तातडीने दखल घेत तक्रारीची पडताळणी करण्यासाठी तपासणी पथकाची संख्या वाढवावी, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी (दि.23) विभागाला दिले. याप्रकरणी संबंधित दोषी कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना कृषिमंत्री भुसे यांनी दिल्या आहेत. दरम्यान सरकारी कंपनी महाबीजबद्दल देखील शेतकर्यांच्या तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी महाबीजचे बियाणे उगवले नाही, त्या शेतकर्यांना तातडीने महाबीजचे बियाणे बदलून द्यावेत, असे आदेशही कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नाही याच्या अभ्यासासाठी परभणी कृषी विद्यापीठातील सोयाबीनचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागातील अधिकार्यांची समिती नेमण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील शेतकर्यांना बियाणे-खते उपलब्ध व्हावेत यासाठी कृषिमंत्री गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौर्यावर होते. बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करीत असताना शेतकर्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषिमंत्र्यांकडे केल्या होत्या. कृषिमंत्र्यांनी काही शेतकर्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणीही केली.
उस्मानाबाद, सोलापूर, बीड येथे झालेल्या कृषी आढावा बैठकांमध्ये त्यांनी कृषी अधिकार्यांना बियाणे खते शेतकर्यांना उपलब्ध होतानाच शेतकर्यांच्या कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका, असे सांगितले. मंगळवारी कृषिमंत्र्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा या भागाचा दौरा केला. पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकर्यांनी पेरणी करू नये, असे आवाहनही कृषिमंत्री आपल्या दौर्यात शेतकर्यांना करीत आहेत.
ज्या शेतकर्यांनी महाबीजचे सोयाबीन बियाणे पेरले व ते उगवून आले नाही, अशा तक्रारीची तातडीने दखल घेऊन तपासणी अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक यांना श्री. भुसे यांनी दिल्या. “बियाणे उगवण क्षमतेच्या तक्रारीची तातडीने पडताळणी करण्यासाठी पथकाची संख्या वाढविण्यात येत आहे,” असे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.