Sharad Pawar

भाजप पाठवणार पवारांना 10 लाख जय श्रीराम लिहीलेली पत्रे

देश विदेश न्यूज ऑफ द डे

अनोख्या पध्दतीने करणार पवारांच्या वक्तव्याचा निषेध

मुंबई ः आयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचं भूमीपूजन 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अनेक वर्षांपासून रामभक्तांना ज्या दिवसाची ओढ होती तो दिवस जवळ आला आहे.

यातच शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे समस्त रामभक्तांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप भाजपने केला आहे. शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या मुंबईतील घरच्या पत्त्यावर राज्यभरातून 10 लाख पोस्टकार्ड ’जय श्रीराम’ लिहून पाठवली जाणार आहेत.

भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी या अभियानाची घोषणा करत पनवेल येथील पोस्ट ऑफिसमधून पोस्टकार्ड शरद पवार यांना धाडण्यात आली.

राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? असं वक्तव्य शरद पवार यांनी करणे म्हणजे फारच खेदजनक आहे. याचा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने या गोष्टीचा निषेध केला आहे.

समस्त प्रभू रामचंद्र भक्तांच्या भावना यानिमित्ताने तीव्र आहेत आणि म्हणूनच याविरोधात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ’जय श्रीराम’ लिहिलेली पत्र शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पाठवावीत, असे आवाहन भाजपाच्या कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

Tagged