sindfana prakalp

सिंदफणा प्रकल्पही भरला; नागरिकांनी सतर्क रहावे

न्यूज ऑफ द डे बीड शिरूर

शिरुर, दि.16 : बर्‍याच वर्षानतंर सुरुवातीपासुनच चांगला पाउस पडला. त्यामूळे सिंदफणा प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरला आहे. सिंदफणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात असलेले प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असल्या कारणाने सिंदफना प्रकल्प ओव्हर झालेला आहे. सध्या या प्रकल्पातून सिंदफणा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याचा फायदा माजलगाव धरणाला होणार आहे.


सिंदफणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्यता वर्तलली जात आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे, सखल भागात राहणार्‍या नागरिकांनी तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी-नाले ओढे काठच्या नागरिकांनी दक्ष रहावे तसेच पाणीसाठ्यात वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपाञापासून, ओढ्यापासून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे. नदी अथवा ओढे-नाले पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. अतिवृष्टी झाल्यास भूस्खलन व होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंगरात राहणार्‍या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे. नदीक्षेञामध्ये पर्यटनासाठी जाणार्‍या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये, सेल्फी काढू नये आपत्कालीन परिस्थितीत तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन यांच्याशी संपर्क साधावा, असे तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती तथा तालुका दंडाधिकारी शिरूर कासारचे श्रीराम बेंडे यांनी कळवले आहे.

बिंदुसरा प्रकल्प भरला! आता माजलगावची बारी

माजलगाव धरणाला फायदा

सिंदफणा नदीवर माजलगाव धरण वसलेले आहे. त्यामुळे या प्रकल्पातून खाली सोडण्यात येणारे पाणी थेट सिध्देश्वर बंधार्‍यात येते हा बंधारा यापुर्वीच ओव्हरफ्लो झाले आहे. तिथून ते पाणी थेट माजलगाव धरणात येते. सध्या पावसाचे प्रमाण पाहता माजलगाव धरणही लवकरच भरण्याची शक्यता आहे.

शिरूर शहराजवळील सिंदफणा बंधाराही ओव्हरफ्लो झाला आहे.

मांजरा धरण मृतसाठ्यात

बीड जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे धरण म्हणून मांजरा धरणाकडे पाहीले जाते. धरणाच्या पाण्यावर केज, अंबाजोगाई शहर, तसेच तालुक्यातील काही गावे या धरणावर अवलंबून आहेत. लातूर शहरासाठी, जिल्ह्यासाठी या धरणाचा मुख्यत्वे मोठा लाभ आहे.

Tagged