railway indian

राजसरकारच्या उदासिनतेमुळे नगर -बीड -परळी रेल्वेमार्गाला खीळ

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

377 कोटीचा निधी राज्य सरकारकडे थकित

बीड, दि.25 : नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून जवळपास एका वर्षापासून निधी मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. या रेल्वेमार्गाच्या एकूण किंमतीपैकी निम्मा निधी राज्य व निम्मा निधी केंद्र सरकारने देणे प्रस्तावित आहे. परंतु राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे रेल्वे प्रकल्पाचा 377 कोटी रुपयांचा निधी थकला असून निधी अभावी रेल्वे मार्गाच्या कामाला खीळ बसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत रेल्वे प्रकल्पाला केवळ केंद्र सरकारच्या वाट्याचा निधी मिळत असून याकामी खा.प्रितमताई मुंडे यांचा पाठपुरावा यशस्वी ठरतो आहे.

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रेल्वे विभाग व जिल्हा प्रशासनाची व्हर्चुअल बैठक घेताना खा. डॉ.प्रीतमताई मुंडे



बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मंगळवारी (दि.25) नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रेल्वे विभाग व जिल्हा प्रशासनाची व्हर्चुअल बैठक घेतली. यावेळी रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा घेताना त्यांनी हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दोन्ही विभागांना दिल्या. रेल्वे विभाग व जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम केले तर रेल्वे प्रकल्पासाठी हा समन्वय फलदायी ठरणार असल्याचे खा.मुंडे यांनी म्हटले. रेल्वे व जिल्हा प्रशासनाने एका आठवड्यात बैठक घेऊन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम ठरवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प केवळ रेल्वे विभागाची जवाबदारी नसून हा प्रकल्प जिल्हा प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे सूचित करताना खा.मुंडे यांनी रेल्वेच्या कामातील अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या. तसेच रेल्वे मार्गाच्या कामातील अडचणी सोडवण्यासाठी आपण देखील केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान राज्यात भाजपचे सरकार असताना पंकजाताई मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारच्या वाट्याचा निधी प्रकल्पासाठी मिळत होता, परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून नगर-बीड-रेल्वे मार्गासाठी मिळणारा राज्याच्या वाट्याचा निधी थकला असून निधी अभावी रेल्वेमार्गाच्या कामात दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. परिणामी या प्रकल्पाची किंमत देखील दिवसेंदिवस वाढत आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून रेल्वे मार्गाचे काम सुरळीत चालू राहावे व हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे अशी भावना खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली.

Tagged