suresh dhas

ऊसतोड कामगार, मुकादमांचा प्रश्न सुरेश धस यांच्या ‘फडात’

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र राजकारण

मागण्या मान्य केल्याशिवाय कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही -आ.सुरेश धस

बीड, दि.26 : बीड जिल्ह्याचं संपूर्ण राजकारण आजपर्यंत ऊसतोड मजूर, मुकादमांच्या भोवती फिरलेले आहे. राज्यात आणि राज्याबाहेरील कारखान्यालाही मजुर पुरविण्याचे काम बीड जिल्ह्यातून होते. त्यामुळे सांगतानाच बीडची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी केली जाते. आतापर्यंत या मजुरांचं नेतृत्व स्व.गोपीनाथ मुंडे यांनी केलं होतं. त्यांच्या पश्चात हे नेतृत्व पंकजाताई मुंडे यांच्याकडे आलं. मात्र मागच्या काही महिन्यांपासून सुरेश धस आणि ऊसतोड कामगार यांच्यात जवळीकता वाढत आहे. कारण काल सुरेश धस यांच्या घरी ऊसतोड मजुर, मुकादम संघटनेचे नेते गेले होते. तर आज आ.सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत मांजरसुंबा येथील एका हॉटेलमध्ये ऊसतोड मुकादमांची बैठक झाली. यात स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे व पंकजाताई मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग उपस्थित होता.

या बैठकीत बोलताना आ.धस म्हणाले, मागील कराराच्या अंतरिम वाढीसह ऊसतोड कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय कोणत्याच कारखान्याचा धुराड यावर्षी पेटू देणार नाही. ऊसतोड कामगारांचे मुकादम, त्यांचे प्रतिनिधी यांनी माझ्या निवासस्थानी भेट घेतली. ऊसतोड कामगारांच्या संघटनांच्या या मागणीला माझा पाठिंबा आहे, असल्याचे धस म्हणाले.

बैठकीस माजी आ केशवदादा आंधळे, गोरक्षदादा रसाळ, सुखदेव सानप, दत्तोबा भांगे, विष्णुपंत जायभाय, तात्यासाहेब हुले बापु, दशरथ दादा वनवे, बाबुराव केदार, रामचंद्र घोळवे, सुरेश वणवे, भाऊसाहेब आंधळे, संजय तिडके, देविदास तोंडे, श्रीमंत जायभाये, जेधेराव तिडके, महादेव बडे, प्रवीण बांगर, भारत लवांडे, सर्जेराव वाघमोडे, सर्जेराव डोईफोडे, विकास सानप, नाना सकुंडे, बंडू शेंडगे, बंडू राठोड यांच्यासह मुकादम संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

काय आहेत मजुरांच्या मागण्या?
ऊसतोडणी कामगारांना मागील पाच वर्षातल्या अंतरिम वाढीसह 150 टक्के वाढ द्यावी. मुकादमांचे कमिशन 37 टक्क्यांपर्यंत वाढवावे. बैलगाडीचा दर 208 रुपये ज्यामध्ये हेळक, मुंगळा, जुगाड, घंटा तसंच डोकी सेंटर 239 रुपये, ट्रक, ट्रॅक्टर टोळी तर गाडीसेंटर 267 रुपये अशा पद्धतीने आजचे दर आहेत.

बिगारी काम करणार्‍यांंपेक्षाही कमी मजुरी
आजच्या प्रचलीत दरानुसार नवरा-बायको ऊसतोड कामगार जोडीला 416 रुपये मिळतात. परंतु मिस्त्री, बिगारी कामगार इतर कामावर असलेले मजूर सकाळी 11 ते 5 या वेळेतच काम करतात. तर ऊसतोड कामगार रात्रंदिवस काम करुनही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. ते कारखान्यावर जनावरे सांभाळतात, त्यांचा खुराक पेंडचा खर्च या सगळ्या गोष्टीचा विचार करता, ऊसतोड कामगारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे ऊसतोड कामागारांच्या गळतीचे प्रमाण मागील पाच वर्षात 60 टक्क्यांवर गेलेलं आहे. ऊसतोडणीत पैसा मिळत नसल्याने तो दुसरीकडे जात आहेत. या कारणांमुळे मुकादमांच्या संसाराचे वाटोळे झालं आहे. 18.5 टक्के कमिशनवर भागत नाही. 3 रुपये, 4 रुपये शेकड्याने व्याजाचे पैसे घेतल्याने यात व्यावहारिकता जाणवत नाही. अनेक मुकादम यामुळे व्यसनाधीन झालेले आहेत. अनेकांनी आपली जीवनयात्र संपवली आहे, त्यामुळे ही भाववाढ झाली पाहिजे, असं सुरेश धस म्हणाले.

कारखान्यावर शौचालयाची सोय नाही
ऊसतोड मजुरांचा करार तीन वर्षाचाच असला पाहिजे, पाच वर्षाचा चालणार नाही. टीडीएस हा ऊसतोड कामगारांकडून कपात केला जाता कामा नये. अनेक कारखान्यांनी असे उद्योग केलेले आहेत. तसेच 100 टक्के शौचालयाची सोय केल्याशिवाय कुठल्याही कारखान्याला साखर आयुक्तांनी गाळप परवानगी देऊ नये. शौचालयाची सोय नसल्याने महिलांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होते. अनेक महिलांना यामुळे किडनी स्टोनचे आजार होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे धस म्हणाले.

बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा धिक्कार
ऊसतोड मजुरासंदर्भात जो 32 कलमी कार्यक्रम सुचवलेला आहे, त्याची आंमलबजावणी न करणार्‍या बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा मी निषेध करतो. ऊसतोड कामगारांचा विमा हा कारखान्यांनीच भरला पाहिजे. तसंच येणे-जाणे भाडे 100 टक्के कारखान्यांनीच दिले पाहिजे. प्रत्यक्षात गाडीभाडे 20 हजार असेल तर कारखाना 12 हजार रुपये आणि मुकादम 8 हजार पदर भरतो. हा अन्याय आणि ऊसतोड कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न सुटल्याशिवाय कुठल्याही कारखान्यावर कामगार जाणार नाहीत, असा इशाराही सुरेश धस यांनी दिला आहे.

पंकजाताईंचा शब्द अंतिम असेल
पंकजाताई मुंडे या आमच्या नेत्या आहेत. त्या ऊसतोड मजुरांच्या लवादाच्या प्रमुख आहेत. त्या जे काही म्हणतील तो शब्द अंतिम असेल, मात्र ऊसतोड मजुर, मुकादमांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही, अशी माहितीही आ.सुरेश धस यांनी दिली.

ऊसतोड मजुरांना सुरेश धस जवळचे वाटू लागले
लॉकडाऊन 1 च्यावेळी ऊसतोड मजुरांना कारखान्यातून सुटी देण्यात यावी, असा आवाज सर्वप्रथम आ.सुरेश धस यांनीच उठवला होता. त्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी मजुरांना स्व जिल्ह्यात जाऊ देण्याची मागणी केली होती. तर मंत्री धनंजय मुंडे यांनी या मजुरांना जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र या सगळ्यांवर सुरेश धसांनी कडी करीत ऊसतोड मजुरांसाठी स्वतःवर गुन्हे दाखल होऊ दिले पण मागे हटले नाहीत. ते या मजुरांना थेट जिल्ह्यात घेऊन आले. त्यामुळेच ऊसतोड कामगारांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी आ.सुरेश धस आपलेसे वाटू लागले आहेत.