DEVENDRA FADANVIS

जात ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जातंय- देवेंद्र फडणवीस

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

मुंबई ः माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काहीजणांना वाटत असून काही लोक तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा समाजाला आणि राज्यातील सर्व समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाहीत असंही ते म्हणाले आहेत.
      जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. मग कसंही करुन हे मागच्या सरकारच्या माथी कसं मारायचं सुरु होतं. दुर्दैवाने हे बोलणं मला शोभत नाही पण आज स्पष्टपणे सांगतो. काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं. काहीजण असा प्रयत्न करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाचं नेतृत्व कोणी करावं यासंबंधी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज आपलं आराध्यदैवत आहेत. त्यांच्या वंशजांबद्दल आपल्या सर्वांच्या मनात अपार श्रद्धा आहे. त्यामुळे यांच्यात कोणी फूट पाडू नये. कोणी नेतृत्व करावं यासाठी छत्रपतींच्या घरात दोन भाग पडतायत अशी परिस्थिती असू नये. दोघांनी त्याचं नेतृत्व केलं पाहिजे. दोघंही समजूतदार असल्याने वाद होणार नाही आणि कोणी त्यासाठी प्रयत्न करु नये अशी हात जोडून विनंती आहे. पोलीस भरतीवर बोलताना नाराजी व्यक्त करत त्यांनी सांगितलं की, भरती करावीच लागणार आहे, ती थांबवता येणार नाही. पण आता लगेच ती करण्याची घाई नाही. सुप्रीम कोर्टात सध्या मराठा आरक्षणावर काय होणार आहे, स्थगिती हटवू शकणार आहोत का? हे महत्त्वाचं आहे. याला एक महिनाच लागणार आहे. एक महिना उशिरा भरती झाली तर काही नुकसान होणार नाही. पण आधी झाली तर निश्चितच नुकसान होणार आहे. म्हणून या गोष्टीचा विचार केला पाहिजे, आजच करायची असेल तर चर्चा करा, मार्ग काढा. मराठा समाजाला आश्वस्त करा. अशी कोणतीही चर्चा न करता इतक्या गंभीर परिस्थितीत हा निर्णय घेतला जात आहे. राज्यकर्त्यांनी निर्णय घेताना परिणाम काय होणार आहेत याचा विचार केला पाहिजे.

Tagged