देश विदेश

मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला फटकारले!

By Karyarambh Team

September 24, 2020

मुंबई : तसं पाहिलं तर आपण अतिशय तत्पर आहात, पण जेव्हा तुमच्यावर आरोप लागले जातात, त्यावेळी तुम्ही पावलं मागे घेतात अशा शब्दात अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालय तोडफोड प्रकरणाच्या खटल्या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला गुरुवारी फटकारले आहे. याप्रकरणी उद्या शुक्रवारी दुपारी 3 वाजता सुनावणी करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कंगना राणावत विरूद्ध शिवसेना वादाचे नाट्यही रंगले होते. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या ऑफिसचे अनधिकृत बांधकाम तोडले. याविरोधात तिने न्यायालयात धाव घेतली असून खटला सुरु आहे. याप्रकरणी उत्तर देण्यासाठी बीएमसीच्या वकिलांनी 2 दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यामुळे, न्यायाधीश कठावडा भडकले. एखाद्याचं घर तोडण्यात आलंय. मग, पावसाळ्याच्या वातावरणात त्या घराला असंच पडीक ठेवता येणार नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले. तसं पाहिलं तर आपण अतिशय तत्पर आहात, पण जेव्हा तुमच्यावर आरोप लागले जातात, त्यावेळी तुम्ही पावलं मागे घेतात, असेही न्यायाधीश म्हणाले. भिंवडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीवरून देखील न्यायालयाने संताप व्यक्त करत तिकडेही लक्ष द्यायला हवे होते असं म्हटलं आहे. यावरून कंगनाने हल्लाबोल करत बेकायदेशीररित्या माझे घर पाडण्यापेक्षा त्या इमारतीकडे लक्ष दिले असते तर 50 जणांचे जीव वाचले असते, असे कंगनाने म्हटले आहे. यापूर्वी तिने आज माझे घर तोडले आहे. उद्या तुझा गर्व तुटेल, अशी टीका कंगनाने केली होती.