आरक्षणासाठी मराठा नेत्यांना जागे होण्याची गरज-पार्थ पवार

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : आरक्षणासाठी मराठा नेत्यांनी जागे होण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी व्यक्त केले आहे. तालुक्यातील केतुरा येथील 18 वर्षीय विवेक राहाडे याने आत्महत्या केली. याप्रकरणावरून त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत राज्य शासनालाही लक्ष्य केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत खटला घटनापीठाकडे वर्ग केला. कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. आता पुन्हा एकदा आत्महत्येचं सत्र सुरू झालं आहे. या आरक्षण लढ्यात पार्थ पवारांनी उडी घेतली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील पाऊल उचलावे. याशिवाय मराठा नेत्यांनी आता जागे व्हावे, असेही म्हटले आहे. विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पीढीचे भविष्य धोक्यात आले आहे. मी या पेटलेल्या मशालीला स्वत:च्या ह्रदयात स्थान देऊन विवेक आणि कोट्यवधी असहाय विवेक यांच्या न्यायासाठी दरवाजे ठोठावणार असल्याचे पार्थ यांनी म्हटले आहे.

Tagged