suicide

क्राईम

चप्पू उलटल्याने तिघे बुडाले!

By Keshav Kadam

October 22, 2020

वडवणी दि.22 : दिवसभर शेतात काम करुन सांयकाळी घरी येत असताना नदी ओलांडून यावे लागते. चप्पूच्या सहाय्याने नदी ओलांडत असताना अचानक आलेल्या जोराच्या वार्‍याने चप्पू पलटला. यामध्ये मायलेकरासह एका चिमुकली बुडली असून पोहता येत असल्यामुळे दोघे सुखरुप बाहेर आले. ही दुर्देवी घटना गुरुवारी (दि.22) सायंकाळी सहाच्या सुमारास वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे घडली. सुषमा भारत फरताडे (वय 32) त्यांचा मुलगा आर्यन भारत फरताडे (वय 8) व पुजा राजाभाऊ काळे (वय 10) हे चप्पू उलथल्याने नदीत बुडाले आहेत. तर भारत राजाभाऊ फरताडे (वय 34) व अंकिता इंद्रजित नाईकवाडे (वय 60) यांना पोहता येत असल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. भारत फरताडे, अंकिता नाईकवाडे, सुशिला फरताडे, आर्यन फरताडे, पूजा काळे हे पाच जण शेतातून चप्पूतून घराकडे येत होते. यावेळी अचानक वादळी वारे सुटल्याने चप्पू पाण्यात उलटला. यात सुशिला फरताडे, आर्यन फरताडे व पूजा काळे हे तिघे पाण्यात बुडाले तर भारत फरताडे आणि अंकीता नाईकवाडे पाण्यातून सुखरुप बाहेर आले. घटनेची माहिती मिळताच वडवणी तहसिलदार श्रीकिसन सांगळे, वडवणी पोलीस, मंडळ अधिकारी, तलाठी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. बेपत्ता झालेल्या तिघांचाही शोध सुरु आहे.

विनायक मुळे यांच्यामुळे दोघांचा जीव वाचलाभारत फरताडे आणि अंकीता नाईकवाडे या दोघांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख विनायक मुळे यांनी मोठी मेहनत घेतली. त्यांनी पाण्यात उडी घेऊन या दोघांना सुखरुप बाहेर काढत त्यांचे प्राण वाचविले.