अंबाजोगाई

जळून कोळसा झालेल्या महिलेचा मृतदेह सापडला

By Karyarambh Team

November 30, 2020

अंबाजोगाईतील घटना; घातापाताचा संशय

 अंबाजोगाई  दि.30 ः अंबाजोगाई नजीक असलेल्या पोखरी शिवारात सोमवारी (दि.30) दुपारी 55 वर्षीय महिलेचा मृतदेह सोयाबीनच्या ढिगार्‍याजवळ जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोबतच बाजूचा सोयाबीनचा ढिगाराही जाळून खाक झाला आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे कि घातपात किंवा अपघात याचा तपास पोलीस करत आहेत.       काशीबाई विष्णू निकम (वय अंदाजे 55) असे त्या मृत महिलेचे माहेरचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. काशीबाईचे सासर परळी तालुक्यातील नागपिंपरी आहे. लग्नानंतर काही दिवसातच काशीबाई माहेरी निघून आली आणि स्थायिक झाली. पोखरी गावात मागील चार दिवसांपासून सप्ताह सुरू होता. रविवारी रात्री काशीबाईने सप्ताहाची पंगत दिली. सर्व वारकरी भोजन करून गेल्यानंतर ही महिला घरात दिसून आली नाही. पंगत दिल्यानंतर ती बेपत्ता झाल्याचे शेजार्यांनी सांगितले. सोमवारी सकाळी सायगाव ते गित्ता या शिवरस्त्यावर असलेल्या दत्तमंदिर परिसरातील शेतात सोयाबीनच्या ढिगार्याजवळ महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला. शेतात गेलेल्या शेतकर्याच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीसांनी दिली. त्यांनतर ग्रामीण ठाण्याचे निरिक्षक महादेव राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची ओळख पटविली. दरम्यान, मृतदेहाची अवस्था पाहता या महिलेने आत्महत्या केली की तिचा खून झाला किंवा अपघात याच तपास पोलीस करत आहेत. मृतदेहाची अवस्था अतिशय वाईट असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.