dilip gandhi

तीन कोटीचा गैरव्यवहार; माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधींसह इतरांवर गुन्हा नोंद

क्राईम महाराष्ट्र

अहमदनगर – नगर अर्बन बँकेत सुमारे 3 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार करत बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी माजी खासदार तथा बँकेचे माजी चेअरमन दिलीप गांधी, तत्कालीन शाखा अधिकारी घनशाम अच्च्युत बल्लाळ, कर्जदार आशुतोष सतिश लांडगे आणि इतर संचालक मंडळ यांच्यावर मंगळवारी (दि.22) सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शाखा अधिकारी मारूती रंगनाथ औटी (वय 45, रा. पाईपालाईन रोड, अहमदनगर) यांनी दिली आहे. भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत बँकेच्या प्रशासकांनी नियुक्त केलेले प्राधिकारी, अर्बन बँकेचे शाखा अधिकारी मारूती औटी यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून या सर्व जणांविरोधात भा.दं.वि. कलम 406, 420, 465, 467, 471 व 120ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन हे करत आहेत.

काय आहे हे गैरव्यवहार प्रकरण
शाखा अधिकारी मारूती औटी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की 7 ऑक्टोबर 2017 ते 10 नोव्हेंबर 2017 या दरम्यान बँकेचे माजी चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी (रा. देवेंद्र बंगला, आनंदऋषी मार्ग, अमहदनगर), मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्याम अच्युत बल्लाळ (रा. अर्बन बँक कॉलनी, शिलाविहार समोर, गणेश मंदीराशेजारी, सावेडी, अहमदनगर), कर्जदार मे. टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीचे आशुतोष सतिष लांडगे (रा. शिवानंद, वेदांतनगर, सावेडी, अहमदनगर) आणि संचालक मंडळ सदस्य यांनी कट रचुन, संगनमत करुन, बँकेस खोटे कागदपत्र तयार करुन बँकेच्या तीन कोटी रूपयांच्या रकमेचा अपहार करुन ठेवीदार, सभासद यांचा विश्वासघात केलेला आहे. सदर 3 कोटी रूपयांची रक्कम या आर. बी कासार, मे. देवी एजन्सी व मे. गिरीराल एंटरप्राइजेस, संगमनेर यांच्या खात्यात वर्ग करुन त्यांच्या खात्याद्वारे काढून घेवून बँकेच्या 3 कोटी रूपयांची फसवणूक केली आहे. आरोपींनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करुन अवास्तव व खोटे कर्ज मंजूर केलेले आहे. त्याद्वारे बँकेच्या रकमेची चोरी, अफरातर व फसवणूक केली आहे. असे या फिर्यादीत म्हंटले आहे.

Tagged