avkali paus

बीड

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -धनंजय मुंडे

By Karyarambh Team

February 20, 2021

परळी- गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून, या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामा़र्फत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडला. या पावसाच्या तडाख्याने काढणीस आलेली ज्वारी, गहू, हरभरा, फळपिके, भाजी-पाला पिके यांसह अन्य पिकांचे बर्‍याच प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी विविध महसूल मंडळामधून प्राप्त होत आहेत. जिल्ह्यातील काही अधिकार्‍यांकडूनही आपण याबाबत फोनवरून माहिती मागवली आहे. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे जिल्हा प्रशासन व राज्य शासन शेतकर्‍यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.दरम्यान अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पंचनामे करून याचा अहवाल राज्य शासनास सादर करावा असे निर्देश ना. मुंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांशी फोनवरून संवाद साधत दिले आहेत.