majalgaon dam

माजलगावात बचाव पथकाची बोट उलटली; कर्मचारी अडकून पडला

न्यूज ऑफ द डे

प्रतिनिधी । माजलगाव
दि. 7 : आजोबा आणि नातू माजलगाव धरणाच्या ऐन पायथ्याला दरवाजाजवळ सिंदफना नदीच्या पात्रात अडकल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी आपत्ती निवारण विभागाकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु पाण्याचा वेग जास्त त्यात अंधार आणि वेड्या बाभळींचा अडथळा होत असल्याने अडकलेल्या व्यक्तीपर्यंत जाण्यात बचाव पथकाला यश आलेच नाही. शेवटी जोराच्या लाटेत बचाव पथकाचीच बोट उलटल्याने पथकातील जवानांनी कसाबसा नदीकाठ गाठला आहे. मात्र एक जवान अद्यापही संबंधीत घटनास्थळी अडकून पडला आहे. रात्री 12 वाजता हे बचावकार्य थांबविण्यात आले आहे. उद्या सकाळी पुन्हा बचावकार्य सुरु करण्यात येईल, अशी माहिती बचाव पथकातील कर्मचार्‍यांनी दिली.

माजलगाव धरणाच्या गेटच्या पायथ्याजवळ देवखेडा येथील एका व्यक्तीचा गोठा होता. मात्र नेहमी रामप्रसाद गोविंद कदम यांचा गोठा होता. पाणी वाढल्याचे त्यांच्या लक्षात न आल्याने ते तिथेच अडकून पडले. दुर्दैव म्हणजे त्यांच्या सोबत त्यांचा सात वर्षाचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हा देखील तिथेच अडकून पडला आहे. त्यांनी एका बाभळीच्या झाडावर आश्रय घेतलेला आहे. दरम्यान बचाव पथकातील फायरमन पवन कराड हे देखील बोट उलटल्यानंतर जवळच एका झाडावर अडकून पडले आहेत. परंतु ते सुरक्षीत असून सकाळपर्यंत आम्ही त्या सर्वांना सुखरूपपणे बाहेर आणू असा विश्वास पथकातील जवान सुनील आदोडे यांनी कार्यारंभशी बोलताना व्यक्त केला.

आरणवाडी तलाव फोडल्यामुळे पाणी वाढले
धारूर तालुक्यातील आरणवाडी तलाव फोडल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सुमारे 1 लाख 32 हजार क्युसेक वेगाने हा विसर्ग असल्याचे धरण अभियंता यांनी कार्यारंभशी बोलताना सांगितले. मात्र पाणलोट क्षेत्रात सध्या पाऊस थांबलेला आहे. रात्रीतून पाऊस न झाल्यास काही वेळाने हा विसर्ग कमी करण्यात येईल, अशी माहिती धरण अभियंता शेख यांनी कार्यारंभशी बोलताना दिली.


Tagged