suicide

सक्तीच्या वीज बील वसुलीने घेतला तरुण शेतकर्‍याचा बळी!

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड


वीज पुरवठा खंडित केल्यामुळे गेवराईत शेतकर्‍याची आत्महत्या
गेवराई
दि.28 : मागील काही दिवसापासून महावितरणने शेतकर्‍यांकडील थकीत वीज बील वसुली सुरु केली आहे. यासाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. शेतीचा विज पुरवठा खंडित केल्यामुळे एका तरुण शेतकर्‍याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथे घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
कृष्णा राजाभाऊ गायके (वय 23 रा.निपाणी जवळका ता.गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. अतिवृष्टीने कंबर मोडलेल्या शेतकर्‍याला आधार देण्याऐवजी महाविवितरणकडून सक्तीची वीजबिल वसुली सुरु आहे. कृष्णा गायके याने शेतात कांद्याचे बी लागवडीसाठी आणले होते. आठ दिवसांपासून शेतातील विहिरीत पाणी असताना देखील पिकाला पाणीही देता येत नाही आणि कांदाही लागवड करता येत नाही, या समस्येने तो चिंतेत होता. याशिवाय अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. याचे अनुदान 3 आणि 2 हजार रुपये खात्यावर जमा झाले. मात्र सात आणि आठ हजार रुपये वीजबिल आणायचं कोठून? आठ दिवसात कांदा लागवड नाही केली तर उत्पन्न हातात येणार नाही. बियाण्यांसाठी गुंतवलेले पैसे देखील मिळणार नाहीत. या विवंचनेतून कृष्णाने टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले. ही आत्महत्या नसून कृष्णा गायकेचा महावितरणने केलेला खून आहे. अशा घटना थांबवायचे असतील तर शेतकर्‍यांची कट केलेले वीज तात्काळ जोडा. अन्यथा गावातील शेतकर्‍यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, असं कृष्णाचे नातेवाईक बंडू गायके यांनी सांगितले.

Tagged