जनतेसाठी इमानदार; हारुणभाई इनामदार

केज न्यूज ऑफ द डे

‘जनविकासा’साठी ‘परिवर्तना’ची साद

शुभम खाडेबीड
राजकारण हे अस्थिर क्षेत्र बनले आहे. या क्षेत्रात कसलाही राजकीय वारसा नसताना अल्पसंख्याक समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने प्रवेश करणे आणि सलग 20 वर्षे राजकारणाच्या मैदानात यश -अपयश पचवत सातत्याने टिकून राहणे, हे वाटते तितके सोपे नाही. धाडसी व्यक्तिमत्वाचेच हे काम. असेच धाडसी, कर्तृत्वान नेतृत्व म्हणून केजचे हारूणभाई चांदपाशा इनामदार यांचं नाव पुढं आलेलं आहे. माजी आमदार स्व. बाबुराव आडसकर यांच्या मुशीत घडलेल्या हारूणभाईंना माजी मंत्री स्व. विमल मुंदडा, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व आणि सहवास लाभला. त्यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळालेले हारूणभाई हे सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन समाजकारण, राजकारणात सक्रीय असून केजवासीयांचे ‘जनसेवक’ आहेत. आता त्यांनी ‘जनविकासा’साठी जनतेला ‘परिवर्तना’ची साद घातली आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेले हारूणभाई मूळ केजचे. त्यांचं शिक्षण उस्मानाबाद जिल्ह्यात झालं. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी ही पदवी घेतली. त्यामुळे त्यांचा केज शहराशी फारसा संपर्क नव्हता. जनमाणसात ओळख नव्हती. समाजातील एक उच्चशिक्षित तरुण इतकीच ओळख असलेल्या हारुणभाईंनी त्यावेळी नौकरीच्या मागे न धावता समाजासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून मित्र परिवार व लोकांच्या आग्रहाखातर 2000 साली सामाजिक क्षेत्रात पदार्पण केले. त्यावेळी त्यांचे कुटुंब हे माजी आमदार स्व. बाबुराव आडसकर यांच्यासोबत निष्ठेने काम करत होते. हारुणभाईंनी 2003 साली पहिल्या वेळेस केज ग्रामपंचायतची निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते बहुमताने विजयी झाले. काही काळ उपसरपंच पद भूषविले. या काळात त्यांना शहरातील प्रश्नांची जाण झाली. तत्कालीन राजकीय परिस्थितीतून त्यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि माजी मंत्री स्व.डॉ. विमल मुंदडा यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यांचं संघटन कौशल्य, प्रभावी वक्तृत्व आणि अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांना पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर सरचिटणीस पदी काम करण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्यांनी नेतृत्व सिद्ध केले. 2010 साली त्यांनी बहुमताने नगरपंचायत ताब्यात घेतली. त्यावेळी त्यांच्या गटाच्या मागासवर्गीय महिलेला नगराध्यक्षपदी विराजमान केले. पुढील निवडणुकीत त्यांचे 6 नगरसेवक निवडून आले. त्यावेळी हारुणभाई हे गटनेते होते. या काळात त्यांनी सत्ताधार्‍यांच्या निष्क्रीय आणि भ्रष्ट कारभारावर बोट ठेवत वेळोवेळी आवाज उठविला. विकासाला नेहमीच त्यांनी प्राधान्य दिले. विकासकामात कधीही राजकारण केले नाही. राजकीय परीस्थितीनुसार त्यांनी पक्ष, नेतृत्व बदलले. स्वतंत्र आघाडी स्थापन करून निवडणुका लढविल्या, मात्र जनतेच्या प्रश्न, हक्कांसाठी ‘इमानदार’ राहून कार्य करणार्‍या हारुणभाई ‘इनामदार’ यांना आता एक संधी देण्याची गरज आहे. ‘आपला माणूस, कामाचा माणूस’ ही ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्याची तब्बल 20 वर्षे खर्च केली, त्यांच्या सेवेचं यावेळी तरी फळ मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून येणारे नेतृत्व ही ओळख असलेल्या हारुणभाईंची यशस्वी वाटचाल आजघडीला तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सर्वधर्मीयांच्या धार्मिक कार्यात हिरिरीने सहभाग
समाजकारण, राजकारण करत असताना हारूणभाई हे शहरात व शहराबाहेर होणार्‍या सर्वधर्मीयांच्या धार्मिक कार्यात हिरिरीने सहभागी होतात. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे या राष्ट्रपुरुषांच्या जयंती साजरी करण्यासोबत जयंती समितीमध्ये सहभागी होत केज शहराचे पुरोगामीत्व टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. तर दरवर्षी सर्वधर्मीयांसाठी रमजान महिन्यात इफ्तारचे आयोजन केले जाते. तर हजारो महिलांसाठी मकरसंक्रांतीच्या काळात हळदी -कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून हारुणभाई कृतीतून समतेचा नारा देतात. अनेक गोरगरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदतीसह कपडे, धान्य यासह लग्नात लागणार्‍या साहित्याची मदत ते सढळ हाताने देत असतात.

दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षण संस्थांचे जाळे
राजकारण करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक संस्था चालू करून विद्यार्थी घडविण्याचे काम केले आहे. लातूर पॅटर्नप्रमाणे आपल्या ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी हारुणभाईंनी शैक्षणिक क्षेत्रात सन 2012 साली पदार्पण करत केज शहरातील शिक्षक वसाहतीजवळ जीवन शिक्षण प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय चालू केले. तसेच पांडुरंग बालगृह, पांडुरंग नवीन बालगृह, जिजाऊ बालगृह, इंग्लिश स्कूल, अस्थिव्यंग विद्यालय चालू केले. या सर्व शैक्षणिक संकुलात शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, अनाथ अशी एकूण जवळपास 1700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

स्वखर्चातून केली कोट्यवधींची विकासकामे
ज्या भागात नगरपंचायतीने नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत, त्या भागासह केज शहराच्या अनेक प्रभागात स्वखर्चाने कोट्यवधींची विविध विकासकामे केली. शहरात जवळपास 50 बोअरवेल घेऊन त्यामध्ये विद्युत पंप बसवून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. तर काही प्रभागात नागरिकांच्या मागणीनुसार नाल्याचे बांधकामही स्वखर्चाने करत आपले राजकीय कर्तव्य केलेले आहे. अनेक भागात वीज पुरवठा, समाजमंदिर, व्यायामशाळा, क्रिकेट क्लब अशा सुविधा त्यांनी स्वखर्चातून दिलेल्या आहेत.

कोरोनाकाळात केले उल्लेखनीय कार्य
हारुणभाई इनामदार यांच्यासह त्यांच्या नगरसेवकांनी कोरोनाकाळात उल्लेखनीय कार्य केले आहे. कोरोनासंदर्भात खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. हातात माईक घेऊन त्यांनी लोकांमध्ये जनजागृती केली. अनेक भागात निर्जंतुकीकरण फवारणी केली. हातावरचे पोट असणार्‍या व्यक्तींच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना सर्वात प्रथम हारुणभाईंची मदत पोहोचली. अन्नधान्यासह वैद्यकीय मदतीसाठी वाहने उपलब्ध करून दिली. या माझ्या सामाजिक कार्याची पावती द्यावी असे कळकळीचे आवाहन जेष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांनी केले आहे.

भूषविलेले राजकीय, सामाजिक पदे
-ग्रामपंचायत सदस्य-केज ग्रामपंचायत
-उपसरपंच -केज ग्रामपंचायत
-नगरसेवक -केज नगरपंचायत
-प्रदेश सरचिटणीस -रा.काँ. पक्ष
-गटनेते -केज नगरपंचायत
-सचिव -झुंजार बहु. से. संस्था, केज
-सचिव – ग्रामलोक शि. प्र. मंडळ, केज
-अध्यक्ष -जनविकास परिवर्तन आघाडी, केज

Tagged