exam paper leak

क्राईम

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

By Balaji Margude

December 17, 2021

पुणे, दि. 17 : आरोग्य सेवा गट ड आणि गट क पेपर फुटीनंतर म्हाडा भरतीचे पेपर फुटले होते. ही कारवाई होत नाही तोच आता पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुपे यांनी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत अपात्र झालेल्या उमेदवारांना पैसे घेऊन पास केले असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांच्यानंतर आणखी एका वरिष्ठ अधिकार्‍याला अटक करण्यात आली आहे.म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या जी .ए . टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्या पिंपरी- चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रं सापडली होती. त्यामुळे टीईटीच्या परीक्षेत घोटाळा झाला असल्याचा पोलिसांचा संशय बळावला होता. गुरुवारी सकाळपासून तुकाराम सुपेंना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. अखेर आज पुणे पोलिसांनी सुपे यांना अटक केली आहे. सुपेसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे..जी. ए. टेक्नॉलॉजीकडे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वीस पोलीस भरती प्रक्रियेचीही जबाबदारी होती. त्याचबरोबर प्रितेश देशमुख प्रमुख असलेल्या जी.ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे महाराष्ट्रातील तब्बल 20 जिल्ह्यांच्या पोलीस भरतीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळं या कंपनीकडून राबवण्यात आलेल्या सगळ्याच भरती प्रक्रियांबद्दल संशय निर्माण झाला आहे.जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे या परीक्षांसाठी उमेदवारांना हॉल तिकीट देणे, पेपरची छपाई करणे, परीक्षा घेणे, पेपर जमा करणे, त्यांचं स्कॅनिंग करून त्याद्वारे गुण देऊन निकाल जाहीर करणे अशी सर्व प्रकारची जबाबदारी होती. पण ही कंपनीच गोपनियतेचा भंग करत असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याचं कंत्राट देणं किती धोकादायक आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.

पेपर फुटीचं चक्रएका पेपर फुटीचा तपास करीत असताना पुणे सायबर पोलीसांना अनेक पेपर फुटीचे धागेदोरे हाती लागत आहेत. आतापर्यंत आरोग्य सेवा, म्हाडा, आणि आता टीईटी… त्यामुळे प्रामाणिक अभ्यास करणारे विद्यार्थी चक्रावून गेले आहेत. आपण किती परीक्षा द्यायच्या आणि का द्यायच्या असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

भाग्यश्री नवटकेंच्या मार्गदर्शनाखाली तपासपुणे सायबर विभागाच्या प्रमुख पोलीस उपायुक्त आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे. नवटके यांनी आतापर्यंत मोठ मोठ्या आर्थिक गुन्ह्यांचे तपास केले आहेत. एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रातील पेपर फुटीचं संपूर्ण रॅकेट त्या उखडून फेकतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जातोय.