sourabh tripathi

टीईटी परीक्षा घोटाळ्यात आणखी एक एजंट पोलीसांच्या ताब्यात

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

बीड, दि. 22 : मागील तीन दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्या प्रकरणी आज आणखी एकाला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. सौरभ त्रिपाठी असं त्या व्यक्तीचं नाव आहे. सौरभ त्रिपाठी हा जीए सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक आहे. तो दुबाईला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले. टीईटी परीक्षा 2018 मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी पुणे सायबर पोलीसांनी ही कारवाई केली आहे.

अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र दाखवण्याचं काम सौरभ त्रिपाठी करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार याला अटक केली आहे. अश्विन कुमार याला कर्नाटकातील बंगळुरू येथून उचलण्यात आले होते. तर यापुर्वी शिक्षण परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे, औरंगाबाद विभागाचा शिक्षण आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आली आहे.

भाजपाचा पदाधिकारी संजय सानप देखील अटकेत
भाजपा युवा मोर्चाचा बीडचा पदाधिकारी असलेला संजय सानप याला देखील दोन दिवसांपुर्वी आरोग्य परिक्षेतील गट ड ची प्रश्न पत्रिका फोडल्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. संजय सानप आणि त्याच्या कुटुंबातील जवळच्या अनेक नातेवाईकांचा या पेपर फुटीसंदर्भात थेट संबंध असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बीडमध्ये आणखी काही जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

उत्तरप्रदेशातही परीक्षा घोटाळा?
सौरभ त्रिपाठी सध्या ‘विनर’ कंपनीमध्ये कार्यरत आहे. सध्या शिक्षण विभागाच्या परीक्षांचे कामकाज विनर कंपनीकडे आहे. त्यामुळे विनरच्या उत्तरप्रदेशातील परीक्षाही वादग्रस्त ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

फसवणूक झालेल्या उमेदवारांनी तक्रार द्यावी
ज्या उमेदवारांनी एजंटांना पैसे दिले त्यांनी पुढे येऊन स्वतः तक्रारदार व्हावे. अशा उमेदवारांना पोलीस सर्वतोपरी सहाकार्य करतील. परंतु उमेदवार पुढे आले नाही आणि त्यांनी पैसे देऊन पेपर विकत घेतल्याचे निष्पन्न झाले तर उमेदवार अडचणीत येतील. त्यामुळे उमेदवारांनी पुढे येऊन पोलीसांना तपासात सहकार्य करण्याचे अवाहन पुणे सायबर पोलीसांनी केले आहे.

पेपर फुटीमध्ये मंत्र्यांचा हात
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी खळबळजनक दावा करत या घोटाळ्यात मंत्र्याचा समावेश असल्याचे सांगितले. लाड यांनी सांगितले की, पेपरफुटी प्रकरणात मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा समावेश आहे. आम्ही यासंदर्भातील पुरावे पटलावर ठेऊ. या प्रकरणात गृहनिर्माण मंत्री, शिक्षण मंत्री यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. प्रसाद लाड यांनी म्हटले की, पेपरफुटी प्रकरणात आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. जर सरकारने सीबीआय चौकशी मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊन मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tagged