अखेर ठरलं! वैद्यनाथ कारखान्याचे ऊस गाळप ‘या’ तारखेपासून होणार

न्यूज ऑफ द डे परळी

शेतकऱ्यांना दिलासा

परळी : भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या चेअरमन असलेला परळीचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना ऊस गाळप करण्यासाठी सज्ज झाला आहे. कारखाना प्रशासनाच्या माहितीनुसार, अखेर उद्यापासून (दि.६) प्रत्यक्ष ऊस गाळप सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

तांत्रिक अडचणीमुळे वैद्यनाथ कारखाना सुरू करण्यास विलंब झाला आहे. कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी लक्ष घालून बंद असलेला कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. महिनाभराच्या तांत्रिक दुरुस्त्या, कामकाजानंतर ऊस गाळपासाठी कारखाना सज्ज झाला आहे. आज (दि.५) सायंकाळपर्यंत कारखाना अंतर्गत टेस्टिंगच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होतील. त्यानंतर उद्या (दि.६) सकाळपासून वैद्यनाथ कारखान्याचे प्रत्यक्ष गाळप सुरू होईल. याला चेअरमन पंकजा मुंडे यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देखील दुजोरा देण्यात आला. परंतु, कारखान्याचे कार्यकारी संचालक जे.पी.एस. दिक्षीतुल्लू यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांचे म्हणणे अधिकृतपणे समजू शकले नाही. दरम्यान, अंबाजोगाईच्या अंबासाखर कारखान्यापाठोपाठ आता परळीचा वैद्यनाथ कारखाना सुरू होणार असल्याने केजसह परळी मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कारखाने बंद राहू नये, अन्यथा..
वैद्यनाथच्या चेअरमन पंकजा मुंडे व अंबासाखरचे चेअरमन रमेश आडसकर यांच्या प्रयत्नानंतर दोन्ही कारखाने प्रत्यक्ष ऊस गाळपासाठी सज्ज झाले आहेत. परंतु प्रत्यक्ष गाळप सुरु झाल्यानंतर पुन्हा तांत्रिक कारणामुळे कारखाने बंद पडू नयेत, याची दक्षता कारखाना प्रशासनाने वेळीच घेण्याची गरज आहे. कारण, तसे झाल्यास केजसह परळी मतदारसंघातील ऊस पेटवून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते हे मात्र नक्की.

Tagged