लोडशेडींग, भारनियमन

बीड जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमन

न्यूज ऑफ द डे बीड

नागरिक त्रस्त

बीड, दि.7 : संपूर्ण बीड जिल्हा आता भारनियमनाच्या खाईत लोटला गेला आहे. काल रात्रीपासून बीड जिल्ह्यातील फिडरवर सहा ते आठ तासांचे चक्री भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे नगारिकांना उकाडा आणि शेतकर्‍यांना ऊसाला पाणी देण्याचा प्रश्न भेडसावणार आहे.
महावितरणकडून आज अधिकृत निवेदन जारी करून सर्वांना सुचना देण्यात आली आहे. या सुचनेत त्यांनी म्हटले आहे की महावितरणतर्फे बीड शहर, बीड ग्रामीण, गेवराई, शिरूर, पाटोदा आणि आष्टी उपविभागात विजेच्या मागणीत अचानकपणे प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे उपलब्ध वीज आणि तुटीमुळे महावितरणला आपत्कालीन भारनियमन (इमर्जन्सी) करावे लागत आहे. सदरच्या आपत्कालीन परिस्थितीत सर्व ग्राहकांना विनंती करण्यात येते की आपण महावितरणला सहाकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोळशाच्या तुटवड्यामुळे भारनियमन
महावितरणच्या अधिकार्‍यांनी दैनिक कार्यारंभला दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे औष्णिक वीज निर्मीतीचे काही ठिकाणचे संच बंद आहेत. त्यात उन्हाळा असल्याने वीजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे इर्मजन्सी लोडशेडींग केल्याशिवाय पर्याय नाही. कुठल्याही क्षणी वीज जावू शकते. फिडरवाईज चक्रीप्रमाणे लोडशेडींग करण्यात येऊन ग्राहकांना वीज पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणीची वीज गूल
काल रात्री आठ वाजल्यापासूनच इर्मजन्सी लोडशेडींग सुरु झालेले आहे. काल अर्धे बीड शहर आणि अर्ध्या जिल्ह्यातील वीज रात्री आठच्या सुमारास गूल झालेली होती. ती थेट पहाटे अडीचच्या दरम्यान आली. त्यामुळे शहरातील नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. तर शेतकर्‍यांना ऊस आणि भाजीपाल्याच्या शेतीला याचा जबरदस्त फटका बसणार आहे.

लोडशेडींगचे वेळापत्रक नाही
वीजेची मागणी अचानकपणे वाढत आहे त्यामुळे कुठल्या भागात कोणत्या वेळेत लोडशेडींग करायचे याबाबत नियोजन झालेले नाही. तरीही ज्या भागातील वसुली कमी त्या भागात अधिकचे लोडशेडींग असा फॉर्म्यूला ठरवला गेला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Tagged