suicide

रोडरोमिओच्या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाईच्या पट्टीवडगावातील घटना; तरुणावर गुन्हा दाखल
अंबाजोगाई
दि.13 : कॉम्प्युटरच्या क्लासेससाठी जाणार्‍या विद्यार्थिनीची येता-जाता सातत्याने छेड काढली जायची. रोजच्या रोडरोमिओच्या छेडछाडीला कंटाळून 12 वीच्या वर्गात शिकणार्‍या 17 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही संतापजनक घटना पट्टीवडगाव येथे घडली. या प्रकरणी मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन तरुणावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपाली रमेश लव्हारे (वय 17, रा. पट्टीवडगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. दिपालीने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. तिचे वडील राज्य परिवहन मंडळात चालक असून सध्या पालघर येथे कार्यरत आहेत. दिपालीची आई सुमित्रा यांच्या फिर्यादीनुसार, मागील काही दिवसांपासून त्यांच्या घराशेजारी राहणारा अकबर बबन शेख हा तरुण दिपालीला कॉम्प्युटर क्लासला जात येत असताना छेडत होता. रस्त्यात अडवून वेडेवाकडे बोलणे, सतत करणे अशा पद्धतीने तो तिला त्रास देत होता. याबाबत दिपालीने आईला सांगितले होते. शुक्रवारी (दि.6 मे) दिपालीच्या वडिलांनी अकबरला बोलावून घेऊन तिला त्रास न देण्याबद्दल बजावले होते. परंतु, त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. त्याचे त्रास देणे सुरु असल्याचे दिपालीने आईला सांगितले होते. त्यावर वडील आणि भाऊ आला की आपण मार्ग काढूत अशी आईने तिची समजूत घातली. अखेर सततच्या त्रासाला कंटाळलेल्या दिपालीने मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आई गावातील जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेली असताना घरात साडीने गळफास घेतला. रात्री 11 वाजताच्या सुमारास आई घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांच्या मदतीने तिला दिपालीला स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले असे फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून अकबर बबन शेख याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम 305 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे.


आरोपीला तात्काळ अटक करावी -ना.धनंजय मुंडे
या प्रकरणातील फरार आरोपीला तात्काळ अटक करून कडक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. या पद्धतीची प्रकरणे बीड जिल्ह्यात खपवून घेतली जाणार नाहीत, संबंधित घटनेची सखोल चौकशी करून पीडितेला न्याय मिळवून देण्यात कोणतीही कसर केली जाणार नाही. सदर प्रकरणातील आरोपीवर कठोर शासन केले जाणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Tagged