Site icon कार्यारंभ लाईव्ह

दुकाने उघडायची की नाही? व्यापारी संभ्रमात; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा!

बीड: जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 12 ते 21 ऑगस्टपर्यंत बीड, माजलगाव, परळी, केज, अंबाजोगाई, आष्टी या पाच शहरात संपूर्ण लॉकडाऊन केले होते. या लॉकदाऊनची मुदत रात्री 12 वाजता संपलेली आहे. परंतु तरीही दुकानदार दुकाने उघडण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या शिथिलतेच्या आदेशाची व्यापारी वाट पहात आहेत. एकंदरीत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट आदेश काढणे गरजेचे असून त्याशिवाय व्यापाऱ्यातील गोंधळ संपुष्टात येणार नाही.
या संदर्भात कार्यारंभने जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ‘थोडं थांबा’ एवढेच त्यांनी सांगितले. त्यामुळे दुकानदारांनी दुकाने उघडायची की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार सर्व बाजारपेठ एकाचवेळी उघडली तर अचानक गर्दी वाढून पुन्हा संसर्गाचा धोका वाढू शकतो, त्यामुळे आज एखादा नवा आदेश काढून लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना जे काही आदेश काढायचे ते त्यांनी एक दिवस आधीच काढायला हवेत जेणेकरून व्यापाऱ्यांचा गोंधळ उडणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यात 862 व्यापारी positive
दरम्यान जिल्ह्यात केलेल्या antigen टेस्ट मध्ये 862 व्यापारी पाच शहरात positive आढळून आले आहेत. तर बीड शहरात 10 दिवसापूर्वी केलेल्या टेस्टमध्ये 453 व्यापारी positive आढळून आले होते.

व्यापाऱ्यांमध्ये संताप
जिल्हा प्रशासनाकडून काहीच आदेश नसल्याने व्यापाऱ्यामध्यें संताप आहे. यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्याची मागणी होत आहे. आधीच चार महिने झाले व्यापार ठप्प आहे, त्यात सणासुदीच्या दिवसातही व्यापार बंद. त्यामुळे दुकाने कायमस्वरूपी बंद करून हातगाडी चालवलेली बरी अशी संतप्त प्रतिक्रिया व्यापाऱ्यांमधून उमटत आहे.

Exit mobile version