Site icon कार्यारंभ लाईव्ह

नेकनूर तालुका चर्चेच्या गुर्‍हाळातच गेली एकेचाळीस वर्षे

neknoor

neknoor

नेकनूर । अशोक शिंदे
दि. 14 : बीड तालुक्यातील उपबाजारपेठ असलेले सर्वात मोठे गाव म्हणून नेकनूर परिचित आहे. गेल्या 41 वर्षापासून विविध निवडणुकीत राजकीय नेत्यांनी नेकनूर तालुका निर्मितीची आश्वासने दिली. मात्र ती हवेतच विरत आहेत. नेमकं तालुका निर्मितीची प्रतिक्षा कधी संपणार असा प्रश्न नेकनूरकरांना पडला आहे .

राज्य महामार्ग क्रं. 156 वर असलेले नेकनूर हे गाव आता जामखेड- अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. येथील लोकसंख्या जवळपास 25 ते 30 हजाराच्या घरात असून नेकनूरचा जवळपासच्या गावा बरोबर 60 ते 70 खेड्यापाड्याच्या लोकांची या ठिकाणी सतत वर्दळ असते. कारण येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार त्याच बरोबर इतर जीवनावश्यक वस्तु या बाजारपेठेमध्ये मिळतात. या ठिकाणी पोलीस ठाणे, स्त्री व कुटीर रुग्णालय, बंकटस्वामी महाराज यांचे समाधीस्थळ, शासकीय अध्यापक विद्यालय तसेच पवित्र इजरत शहा इब्राहिम यांचा दर्गाह, मन्मथस्वामीचे जन्मस्थळ या ठिकाणी असल्याने इतर लोकांबरोबर भाविकांची नेकनूर येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तालुका निर्मितीसाठी लागणारी 25 ते 30 हजाराच्या घरात लोकसंख्या असल्याने सर्व निकशही पूर्ण झालेले आहेत. 1980 पासून आजमितीला 41 वर्षांपासूनची नेकनूरकरांची असलेली मागणी नवीन सरकार व जिल्ह्याचे पालकमंत्री पूर्ण करतील असे वाटत होते. परंतु नवीन सरकारचे दिड वर्ष झाले तरीही याकडे दुर्लक्ष केल्याने नेकनूरकरांंची प्रतीक्षा आद्यपही कायमच असून आहे. तरी नेकनुरला तालुक्याचा दर्जा मिळावा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे .

नेकनूर तालुका का करावा ?
नेकनूर तालुका झाल्यास येथील व जवळपासच्या 60 ते 70 खेड्यापाड्यातील जनतेला बीडला माराव्या लागणार्‍या चकरा बंद होतील व पर्यायाने नागरिकांना आर्थिक झळ ही कमी प्रमाणात बसेल व वेळेचीही बचत होईल .

विकासाला चालना मिळेल.
नेकनूर तालुका व्हावा या साठी 1980 पासून अनेकदा आंदोलने झाली. अनेक ग्रामपंचायतने ठराव दिले होते मात्र अद्यापही सर्व सोयीनियुक्त असणार्‍या नेकनूर गावाला तालुक्याचा दर्जा मिळाला नाही. नेकनूर तालुका झाल्यास सर्वांगीण विकासाला चालना मिळेल व नागरिकांची सुद्धा चांगली सोय होईल.

Exit mobile version