Site icon कार्यारंभ लाईव्ह

शेतकरी कर्जमुक्तीसाठी आणखी 1 हजार 306 कोटींचा निधी

karjmafi

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 2020-21 साठी सात हजार कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित केला आहे. या निधीतून यापूर्वी वितरीत केलेला निधी वगळता 1 हजार 306 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास बुधावारी शासनाने मान्यता दिली आहे. आतापर्यंत राज्यातील 25.77 लाख खातेदारांना 16 हजार 690 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

1 एप्रिल, 2015 ते दि. 31 मार्च, 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या, तसेच, या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019’ ही कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरु असताना देशासह राज्यात कोविड-19 चे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसर्‍या यादीतील पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला होता. या कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला आता गती देण्यात आली असून ज्या शेतकर्‍यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version