Site icon कार्यारंभ लाईव्ह

विद्यार्थ्यांकडून फिसचा एक रुपयाही न घेता पुन्हा परीक्षा घेतली जाईल

rajesh tope

rajesh tope

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

बीड, दि. 22 : कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणं आवश्यक होतं. या सगळ्या जागा भराव्यात अशी माझी भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडलं ते नैतिक नव्हतं. कुंपणानं शेत खालल्याचं समोर आलंय. ते दुरुस्त करणार आहे. जनतेच्या हितासाठी आरोग्य भरती करणं चुकीचं नाही. जे लोक या प्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही अडचण नाही, असं राजेश टोपे म्हणाले. जे दोषी असतील त्या कोणालाही पाठिशी घालण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करणार नाही. गट क आणि गट डच्या तपासाचं काम पोलीस करत आहेत. गट क संदर्भात सध्या कोणतीही अडचण नाही, अशी माहिती आहे. गट ड संदर्भात अडचणी समोर आल्या आहेत. पोलीस तपासात बाबी समोर आल्यानंतर त्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले.


गट क साठी 15 लाख रुपये आणि गट ड साठी 8 लाख रुपयाचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये समोर आहे. अमरावतीमध्ये 200 विद्यार्थ्यांनी पैसे दिले आहेत ही माहिती खरी आहे का? महेश बोटले हे सहसंचालक आहेत, त्यांचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहोचत असतील तर सरकार यासंदर्भात चौकशी करणार का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. यावर बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, दलालांची ऑडिओ क्लिप सायबरकडून तपासली जात आहे. तुमच्या सगळ्यांच समाधान करण्याची माझी जबाबदारी आहे.चौकशीत याची पाळंमुळं खोदून काढूया, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करु,असं राजेश टोपे म्हणाले. आरोग्य विभागानं स्वत: एफआयआर केलेला आहे. आमचा हेतू स्वच्छ होता, असं राजेश टोपे म्हणाले.


टोपे म्हणाले, आपल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यायची का? पात्रता परीक्षा घेऊ किंवा नव्या परीक्षा पद्धतीनं परीक्षा घेतली जाईल. गट ड ची परीक्षा पुन्हा घ्यायची असल्यास पुन्हा एक पैसा न घेताही घेऊ, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. कोणत्याही चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची निवड केली जाणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले.

Exit mobile version