Site icon कार्यारंभ लाईव्ह

प्रस्थापीत मराठा नेत्यांनो तुम्हाला काहीच भमिका घेता येत नसेल तर थूऽऽ तुमच्या जिंदगीवर – आ. विनायक मेटे

VINAYAK METE

VINAYAK METE

बीड- पुर्वी निजाम, आदीलशहा, मोगलांकडे आपले मराठा सरदार असायचे. त्यांच्याकडे कसलाही स्वाभिमान शिल्लक नसायचा. आताही केंद्र आणि राज्यात शेकडो मराठा आमदार आणि खासदार आहेत. त्यांच्याकडे स्वाभिमान काही शिल्लक आहे की नाही? स्वाभिमान शिल्लक असेल तर मग कुणीच मराठा आरक्षणावर का बोलत नाही? तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा पण या गरीब मराठ्यांसाठी तुम्हाला येत्या पावसाळी अधिवेशनात भुमिका घ्यावी लागेल. आमच्या गरीबांच्या लेकरांना ओबीसी मुला-मुलींसारख्या शिक्षणात सवलती मिळाल्या पाहीजेत. त्यांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज मिळाले पाहीजे, अन्यथा हे पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, अशी भुमिका प्रत्येक मराठा आमदारांनी घ्यावी, तुम्हाला अशी भुमिका घ्यायला जमत नसेल तर थूऽऽ तुमच्या जिंदगीवर, थूऽऽऽ तुमच्या लाचारीवर… तुम्हाला मराठा म्हणवून घेण्याचा अजिबात अधिकार नाही, अशी बोचरी टिका आ.विनायक मेटे यांनी मराठा क्रांती संघर्ष मोर्चा दरम्यान केली.

आ.मेटे म्हणाले, बीडमधून हा आरक्षणाचा वणवा पेटला आहे. सरकारने वेळीच उपाययोजना हाती घ्याव्यात. अन्यथा हे मराठे खिळे ठोकलेल्या बुटाने तुम्हाला लाथा घातल्याशिवाय राहणार नाहीत. सभागृहात असलेल्या मराठा अवलादींनी (आमदारांना उद्देशून) मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपली एकजूट दाखवून द्यावी. त्यासाठी शपथ घ्यावी, असे अवाहनही आ.विनायक मेटे यांनी केले आहे.

अनेक मराठे कडी कुलूपात बसले
आम्ही मराठा आरक्षणावर बोलत असताना अनेक मराठा आमदार कडी कुलूप लावून घरात बसले. अरे जरा लाजा वाटू द्या. गरीबांच्या जिवावर निवडून जाता आणि आता त्यांच्यावर वेळ आली तर गप्प बसता? आमच्या गरीबांच्या पोरांबाळांना तुम्ही शिकू देणार नसाल तर तुम्हाला ही जनता खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, अन्यथा पुढचे काही दिवस तुमचे काही खरे नाही, असा गर्भित इशाराही आ.विनायक मेटे यांनी मोर्चाप्रसंगी दिला.


Exit mobile version