1962 पासून गेवराईवर पवार-पंडितांचे राज्य
महायुतीत जागा कोणाची? अजित पवारांची की भाजपाची
बालाजी मारगुडे । बीड
दि.3 : मराठा आरक्षण प्रश्नाची ठिणगी जिथे पेटली ते आंतरवाली सराटी गाव गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या GEVRAI ASSEMBLY ELECTION सीमेवर आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मोठा प्रभाव गेवराई मतदारसंघावर आहे. लोकसभेत खा.बजरंग सोनवणे यांना बीड पाठोपाठ सर्वाधिक लीड देणारा गेवराई मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर 1962 पासून ते आजपर्यत म्हणजेच तब्बल 62 वर्ष आलटून पालटून पवार आणि पंडित घराण्याची सत्ता आहे. त्यापुर्वी फक्त एकदा म्हणजे 1972 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांना पवार आणि पंडितांनी पुढाकार घेऊन गेवराई विधानसभेवर बिनविरोध पाठवले होते. म्हणजेच गेवराईत पवार आणि पंडित घराण्याबाहेर कधी सत्ता गेलीच नाही, अशी एकंदरीत इथली स्थिती आहे. परंतु यावेळी पवार आणि पंडित दोन्ही प्रस्थापित घराणी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने हादरून गेली आहेत. मराठा, ओबीसी आरक्षण प्रश्नाची प्रस्थिापितांना प्रचंड डोकेदुखी झालेली आहे. या आंदोलनाने लोकांचा मुडही पूर्णतः बदललेला दिसत आहे. प्रस्थापित घराण्यावर सामान्य जनतेचा रोष असल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे यंदा सामान्य मतदार प्रस्थापितांना झटका देणार की पुन्हा एक चान्स देणार याबद्दल गेवराईत प्रचंड चर्चा सुरू आहेत.

काय आहे महायुतीची स्थिती?
गेवराईची जागा विद्यमान स्थितीत भाजपच्या ताब्यात आहे. 2014 पासून इथे आ. लक्ष्मण पवार हे आमदार म्हणून कार्य करीत आहेत. या मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. अमरसिंह पंडित AMARSINH PANDIT हे नेतृत्व करतात. त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराजे पंडित यांनी 2019 साली घड्याळ या निशाणीवर विधानसभेची निवडणूक लढवलेली होती. परंतु त्यांचा थोड्या मताने पराभव झाला होता. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या मतदारसंघात तसा प्रभावी चेहरा नाही. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात गेवराईची जागा एकतर भाजपाकडे किंवा अजित पवार गटाकडे जाईल.

काय आहे महाविकास आघाडीची स्थिती?
गेवराई मतदारसंघात महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री बदामराव पंडित BADAMRAO PANDIT हे इच्छुक आहेत. 2019 मध्ये बदामराव पंडित तिसर्या क्रमांकावर फेकले गेले होते. 1995, 1999 आणि 2009 साली त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. गेवराईची जागा कधीच ठाकरेंच्या शिवसेनेने लढवलेली नाही. त्यामुळे या जागेवर महाविकास आघाडीत शरद पवार गटाचा दावा आहे. मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्या पुजाताई मोरे यांनी या जागेवर आपला दावा ठोकला आहे. पुजाताई मोरे या शरद पवार पक्षाच्या किसान आघाडीच्या युवक प्रदेशाध्यक्ष आहेत. शेतकरी प्रश्नावर त्यांनी मोठ मोठी आंदोलने केली होती. 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दबदबा राज्यात होता. अशावेळी पुजाताई मोरे यांनी फडणवीसांची महाजनादेश यात्रा अडवून फडणवीसांविरोधात राज्यभरात वातावरण तयार केले होते.
मनोज जरांगे फॅक्टर चालणार काय?
गेवराईत मनोज जरांगे फॅक्टर निर्णायक स्थितीत आहे. मनोज जरांगे पाटलांसोबत MANOJ JARANGE वावरणारे अनेक कार्यकर्ते या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. बीड लोकसभा निवडणुकीत गेवराईने बजरंग सोनवणे यांच्या पारड्यात 42 हजार मतांची लीड दिली होती.
ओबीसी फॅक्टरचा परिणाम होईल का?
गेवराई मतदारसंघात ओबीसी फॅक्टरचा देखील जोरात परिणाम होईल. या मतदारसंघातील निवडणूक विकासकामावर न होता ती जातीवर होईल, असेच इथले वातावरण आहे. मराठा आरक्षणाचा जोर वाढला की ओबीसी आरक्षण बचावचे कार्यकर्तेही दंड थोपटून मैदानात उतरत आहेत. विशेष म्हणजे महायुती, महाविकास आघाडी आणि मनोज जरांगे पाटील या तिन्हीकडच्या इच्छुकांमध्ये मराठा उमेदवार आहेत. त्यामुळे ओबीसीकडून एकाच उमेदवाराचा विचार झाला तर ओबीसी फॅक्टरचा बोलबाला राहील.

आ. लक्ष्मण पवार निवडणूक लढविणार का?
आ. लक्ष्मण पवार यांनी 2014 आणि 2019 असा सलग दोनवेळा विजय मिळवलेला आहे. यावेळी त्यांची प्रकृती बरी नसल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. लोकसभा निवडणुकीतही लक्ष्मण पवार LAXMAN PAWAR हे पंकजाताई मुंडे PANKAJA MUNDE यांच्या प्रचारात फारसे सक्रीय दिसले नाहीत. त्यामुळे पंकजाताई मुंडेंचे कार्यकर्ते लक्ष्मण पवारांना सहकार्य करण्याची अजिबात शक्यता दिसत नाही. गेवराईत अशाही चर्चा आहेत की यावेळी आ. लक्ष्मण पवार ब्रेक घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या जागी बाळराजे पवार यांच्या पत्नी गिताभाभी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. लक्ष्मण पवार यांनी मतदारसंघात रस्त्याची दर्जेदार कामे केली ही त्यांची जमेची बाजू आहे. परंतु मराठा आरक्षणाचा रोष भाजपा पक्षावर जसा आहे त्याचप्रमाणे आ.लक्ष्मण पवार यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर आहे. तो रोष टाळण्यासाठी देखील गीताभाभींना पुढे केले जाण्याची शक्यता आहे.

विजयसिंह पंडितांना संधी मिळेल का?
गेवराई विधानसभेत 2004 नंतर शिवाजीराव पंडित SHIVAJIRAO PANDIT यांच्या घरात विजयाचा गुलाल पडलेला नाही. 2019 मध्ये विजयसिंह पंडित यांचा अवघ्या 6792 मताने आ. लक्ष्मण पवार यांनी पराभव केलेला होता. त्यामुळे यंदातरी आपल्या पदरात विजयी गुलाल पडावा, यासाठी विजयराजे पंडित झपाटून कामाला लागलेले आहेत. साखर कारखाना, विविध शैक्षणिक संस्था, स्थानिक सहकारी सोसायट्या, बाजार समिती यावर विजयसिंह पंडित गटाचा प्रभाव आहे. परंतु माजलगाव तालुक्याचा भाग असलेला परंतु गेवराई विधानसभेत असलेला टाकरवण आणि तालखेड जिल्हा परिषद गट तसेच बीड तालुक्याचा भाग असलेला परंतु गेवराई विधानसभेत असलेला पिंपळनेर आणि बहीरवाडी असे चार जिल्हा परिषद गट त्यांच्यासाठी डोकेदुखी आहे. कारण या चारही जिल्हा परिषद गटावर मनोज जरांगे पाटील यांचा मोठा प्रभाव दिसून येतो. जरांगे पाटील विजयसिंह पंडितांच्या बाजुने जमवून घेतील ही शक्यता अगदीच दुर्मिळ आहे. परंतु विजयसिंह पंडित यांच्याकडे त्यांच्या हक्काचा 30 हजार मतांचा गठ्ठा आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. आर्थिक बाजू भक्कम आहे. तरूण तडफदार आहेत. वर्क्तृत्वशैलीही जोरदार आहे. अभ्यासू आहेत. त्यामुळे यंदाच्या प्रमुख लढतीमध्ये विजयराजे असतील.

बदामराव पंडितांची चौथ्या आमदारकीची तयारी
बदामराव पंडित BADAMRAO PANDIT हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. साधा, सरळ, मोकळाढाकळा अशी त्यांची वरवर प्रतिमा असली तरी बदामराव अत्यंत चाणाक्ष बुध्दी असलेले व्यक्ती आहेत. ‘येड घेऊन पेडगावला कसं जायचं’ अन् मतं कशी मिळवायची ही कला त्यांना परफेक्ट जमलेली आहे. त्यांनी 1995 मध्ये स्व. मुंंडे साहेबांशी जमवून घेतले. पण पुढे लागलीच त्यांनी शरद पवार, अजित पवार गटात आपले बस्तान बसवले. स्व. मुंडेंना अमरसिंह पंडित नको म्हणून त्यांनी अंधारातून बदामराव पंडितांना वेळोवेळी मदत केली. परिणामी बदामरावांची आमदारकी एक दोन नाही तर तीनवेळा शाबूत राहीली. 2014 मध्ये स्व. मुंडे यांनीच लक्ष्मण पवारांना राजकारणात आणले तेव्हापासून पंडितांची गेवराईवरील मक्तेदारी संपूष्टात आली. यावेळी बदामराव पंडित उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत होते. त्यांची बजरंग सोनवणे यांना मदत झाली का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे बदामरावांना जागा सोडा म्हणून आपल्याच पक्षाला विनंती करतात की आपल्या तुतारी चिन्हावरच माणूस निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात यावर देखील बदामरावांचे भवितव्य आहे. परंतु 2019 च्या विधानसभेचा परफॉर्मन्स पाहता बदामरावांना मतदारसंघात फारसे अनुकूल वातावरण दिसत नाही.

पुजाताई मोरे यांच्यारूपाने
पहिल्यांदाच महिला उमेदवार रिंगणात
पुजाताई मोरे POOJA MORE ह्या बीड जिल्ह्याच्या राजकारणातील अगदीच कमी वयाच्या राजकारणी आहेत. 21 व्या वर्षी त्या गेवराई पंचायत समितीच्या सदस्य म्हणून निवडून गेल्या होत्या. गेवराई विधानसभेत पहिल्यांदाच महिला उमेदवार म्हणून पुजाताई मोरे निवडणुकीच्या रिंगणात दिसतील. त्यामुळे महिला वर्गाची पसंती पुजाताईंना मिळू शकते. अत्यंत सामान्य घरातील या तरुणीने दुचाकी असो की एसटी बस गेली सात वर्ष गेवराईचा ग्रामीण भाग पिंजून काढलेला आहे. कोणी सोबत आले तर ठिक नाहीतर एकटीने अख्खा मतदारसंघ पायदळी घातलेला आहे. विशेष म्हणजे गेली 62 वर्ष हा मतदारसंघ पवार-पंडितांच्या दहशतीखाली आहे. ही दहशत झुगारून पुजाताई मोरे गावोगाव जावून लोकांना बोलतं करीत आहेत. गेवराईच्या कुठलाही कोपर्यात जा त्यांनी आपली छाप तिथे सोडलेली आहे. इतकच नाहीतर राज्य पातळीवर देखील त्यांनी विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले होते. ऊस उत्पादक शेतकरी बहुसंख्येने या भागात आहेत. त्यामुळे राज्यातील विविध कारखान्यांकडे येथील शेतकर्यांची ऊसाची बीले थकित असतात. पुजाताई मोरे अशा शेतकर्यांच्या मदतीसाठी सदैव हजर असतात. मुळ चळवळीचा त्यांचा पिंड असल्याने त्यांच्या वागण्या बोलण्यात कुठलाही बडेजावपणा नसतो. अगदी सहजपणे त्या सामान्य माणसांमध्ये मिसळून जातात. अंगभूत धाडसीपणा, वर्क्तृत्व, शिक्षण ही सगळी त्यांच्यातील गुणवैशिष्ट्यै आहे. त्यामुळे गेवराईत त्यांच्या बाजुने मोठ्या प्रमाणावर सहानुभूती आहे. विशेष म्हणजे त्या स्वतः मुळच्याच कुणबी मराठा आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून सुरू झालेल्या पहिल्या मराठा क्रांती मोर्चापासून त्या मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या सोबतही त्या काम करताना दिसतात. गेवराईमध्ये पवार आणि पंडित या प्रस्थापित घराण्याबाहेरील सामान्य चेहरा ही त्यांची जमेची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाकडून अनेकजण जायंट किलर म्हणून समोर आले. अगदी त्याच पध्दतीची संधी पुजाताई मोरे यांच्याकडे आहे. लोक प्रस्थापित घराबाहेरील नवा चेहरा शोधतायत. आणि नेमका तोच नवा चेहरा शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे. मनोज जरांगे पाटलांनी प्रस्थापितांना पाडा असा ईशारा केला तरी पुजाताई मोरे अलगद विधानसभेवर जातील. स्वतः कुणबी मराठा असल्याने गेवराईत अनेक ओबीसी देखील त्यांच्या सोबतीला आहेत.

कार्यारंभला काय वाटते?
गेवराई मतदारसंघातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता आणि गेल्या काही दिवसातील राज्यातील राजकीय घडामोडी पाहता इथे भाजपचा टिकाव लागणे मुश्किल आहे. त्यातच देवेंद्र फडणवीसांनी आष्टी भाजपा घेऊ, बदल्यात गेवराई अजित पवारांना देवू असे विधान केले असल्याने कदाचित महायुतीच्या जागावाटपात ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाजपाचे आ. लक्ष्मण पवार हे खरोखरीच एक ब्रेक घेतील, अशी शक्यता जास्त आहे. माजी आ. अमरसिंह पंडितांनी गेवराईत पंकजाताई मुंडेंसाठी जीवतोड मेहनत घेतली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित इथे उमेदवार म्हणून आले तर ओबीसी फॅक्टरचा प्रयोग पंकजाताई समर्थक टाळतील. पालकमंत्री धनंजय मुंडे हे आधीपासून विजयसिंह पंडितांच्या बाजुने आहेत. त्यांचा फायदा विजयसिंह पंडित यांना होईल. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवारांच्या पक्षाला की उध्दव ठाकरेंच्या पक्षाला? असा प्रश्न उरतो. उध्दव ठाकरे बदामराव पंडितांसाठी प्रतिष्ठा करतील का? कारण बदामराव पंडित शिवसेनेत असले तरी त्यांचा प्रचार आणि प्रसार बदामसेना म्हणून असतो. तर इकडे शरद पवारांना शिवाजीराव पंडित घराण्याकडून एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा धोका मिळालेला आहे. पहिल्यांदा 1978 मध्ये, दुसरा 2002 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर तिसरा अजित पवार गटाबरोबर गेल्याने पवारांना गेवराईत फार मोठी खुन्नस काढायची असल्याचे दिसते. त्यामुळे शरद पवारांनी बीडमध्ये येऊन अमरसिंह पंडितांवर हल्लाबोल केला होता. बीड जिल्ह्यात शरद पवारांचे सारे लक्ष कुठे असेल तर तो आहे गेवराई आणि परळी मतदारसंघ. त्यामुळे शरद पवार गेवराई मतदारसंघ आपल्याच पक्षाकडे राहील याची पुरेपूर काळजी घेतील, असे वाटते.

गेवराईचे प्रतिनिधीत्व केलेले आजपर्यंतचे आमदार
1962 – सयाजीराव पंडित
1967 – शाहुराव पवार
1972 – सुंदरराव सोळंके (बिनविरोध)
1978 – शिवाजीराव पंडित
1980 – माधवराव पवार
1985 – शिवाजीराव पंडित
1990 – शिवाजीराव पंडित
1995 – बदामराव पंडित
1999 – बदामराव पंडित
2004 – अमरसिंह पंडित
2009 – बदामराव पंडित
2014 – लक्ष्मण पवार
2019 – लक्ष्मण पवार
2024 – ???