suicide

चिमुकल्यांना गळफास देऊन दाम्पत्याने केली आत्महत्या

क्राईम महाराष्ट्र

पुणे : दोन चिमुकल्यांना गळफास दिल्यानंतर आई-वडिलांनीही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी कुटुंबिक नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. यात 6 वर्षाच्या मुलाचा आणि 3 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.

अतुल दत्तात्रय शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी मयतांची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबिय येथील सुखसागर नगर गल्ली नं. 1 अहिरन्त इमारतीत राहत होते. दरम्यान, अतुल हे शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आयकार्ड बनविण्याचे काम करत असत. त्यांचा प्रेम विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. प्रेम विवाह असल्याने अतुल यांचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज होते. ते त्यांना बोलत नव्हते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान ते त्यांच्या बालपणीच्या मित्राकडे भाड्याच्या खोलीत राहत होते. गुरुवारी दिवसभर दरवाजा उघडला नाही. यामुळे घरमालक म्हणजे त्यांचा मित्र शशी यांनी दार वाजवले. पण दार उघडले नाही. त्यांनी पाहिले असता त्यांना संशय आला. त्यांनी रात्री 11 वाजता पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. त्यावेळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे मार्शलवरील कर्मचारी श्रीकृष्ण खोकले व रणजित काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दरवाजा उघडला असता त्यांना चौघेही एकाच अँगलला गळफास लावून घेतलेल्या आढळून आले. हे चित्र पाहून त्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला होता. त्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. त्यांनतर पोलीस नाईक ललित मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह खाली काढून ते ससून रुग्णालयात शवविच्छेदानासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tagged