बीजिंग : भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल अर्थात एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी शांततापूर्वक तोडगा काढण्याचा चीन करत असला तरी चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने भारतात सुरु असलेल्या ‘बॉयकॉट चायना प्रॉडक्ट्स’ मोहीमेवरुन निशाणा साधला आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणं एवढं सोपं नाही. आमच्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनल्या असून त्या हटवणं कठीण आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम पूर्णपणे अपयशी ठरेल, असं ग्लोबल टाईम्सने आपल्या लेखात म्हटलं आहे.

भारत-चीन सीमेवरील तणावरुन देशात चिनी वस्तूंचा विरोध सुरु असून ‘बायकॉट चायना प्रॉडक्ट्स’ अशी मोहीमही सुरु करण्यात आली आहे. परंतु यावरुन चवताळलेल्या चीनने आपल्या लेखातून भारताला खिजवण्याचा प्रयत्न केला आहे. काही अतिदेशप्रेमी भारतीयांमुळे चीनविरोधी वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप ग्लोबल टाईम्सने केला आहे. या लेखात लिहिलं आहे की, “काही जण आमच्या वस्तूंविरोधात अफवा पसरवत आहेत. पण या वस्तूंवर बहिष्कार घालणं एवढं सोपं नाही. या वस्तू भारतीय सामाजातील अविभाज्य भाग बनल्या आहेत. आता हा सात हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा व्यवहार आहे.”