subhash sarda

सुभाष सारडांच्या द्वारकादास मंत्री बँकेवर प्रशासक

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

बीड, दि.25 : बीड जिल्ह्याला आर्थिक क्षेत्रात पुन्हा एकदा जोरदार हादरा बसला आहे. येथील द्वारकादास मंत्री बँकेत 2019-20 मध्ये झालेल्या प्रशासकीय अनियमततेबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने राज्याच्या सहकार विभागाला आदेश देत बँकेवर प्रशासक नेमण्याची सुचना केली. त्यानुसार सहकार आयुक्तांच्या आदेशाने बीडचे जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांची बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आली. देशमुख यांनी पदभार देखील स्विकारला असून ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये, असे अवाहन देखील त्यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना केले.

सुभाष सारडा हे या बँकेचे सर्वेसर्वा होते. ते मागील अनेक वर्षे बीड जिल्हा बँकेवर देखील चेअरमन म्हणून राहीलेले आहेत. मात्र त्यांच्याच कार्यकाळात बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्याने हा त्यांच्यासाठी आणि एकूणच बीड जिल्ह्याच्या आर्थिक क्षेत्राला मोठा झटका मानला जात आहे.

ठेवीदारांनी काळजी करू नये- प्रशासक विश्वास देशमुख
रिझर्व्ह बँकेने प्रशासक नियुक्तीची कारवाई ही प्रशासकीय अनियमिततांमुळे केली आहे. मागच्या वर्षी बँकेच्या तपासणीत अनियमितता आढळून आलेली होती. बँकेच्या व्यवहारात झालेल्या प्रशासकीय अनियमितता लवकरच दूर केल्या जातील. बँकेची परिस्थिती उत्तम आहे. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. लवकरच बँकेवर पुन्हा लोकनियुक्त संचालक मंडळ येईल, अशी प्रतिक्रिया प्रशासक विश्वास देशमुख यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना व्यक्त केली आहे.

दरम्यान यावर बोलताना बँकेचे व्यवस्थापक आर.जी.सोनी कार्यारंभशी बोलताना म्हणाले, बँकेत काहीही गैरप्रकार झालेले नाहीत. केवळ बँकेत अनियमितता आहे. पाच ते सहा महिन्यात ही अनियमितता प्रशासकांच्या मार्गदर्शनात दुरुस्त करण्यात येतील. बँकेची आर्थिक परिस्थिती अतिउत्तम आहे. त्यामुळे ठेविदारांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये, असे अवाहन सोनी यांनी केले आहे.

बँक अतिशय चांगली – चेअरमन सुभाष सारडा
बँकेवर प्रशासक आल्याचे मला साधे पत्र देखील नाही. माझ्या बोर्डाला देखील तसे पत्र नाही. जोपर्यंत मला अधिकृत कळवले जात नाही तोपर्यंत मी त्यावर भाष्य करू शकत नाही. बँकेत काय झालं हे अद्याप मला माहिती नाही. बँक चालू वर्षी साडेसात कोटी रुपयांनी नफ्यात आलेली आहे. आजही बँकेत 296 कोटीचे डिपॉझिट आहे. सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 130 कोटी रुपये इतर बँकेत ठेवलेले आहेत. 45 टक्के पैसे बँकेत पडून आहेत. त्यामुळे कर्जाला उठाव नाही म्हणून बँकेने डिपॉझिटचे रेट कमी केले होते. त्यामुळे बँकेची परिस्थिती अतिउत्तम आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, असे अवाहन देखील बँकेचे चेअरमन सुभाष सारडा यांनी केले आहे.

काय झाले होते बँकेच्या कारभारावर आरोप?

  • सुभाष सारडा व त्यांच्या संचालक मंडळाने आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या बँकेत प्रचंड अनागोंदी कारभार केल्याचा आरोप करण्यात आला होता. नऊ वर्षात तब्बल 317 कोटी रू. बेकायदेशीररितीने हातोहात वापरून त्यावरील 92 कोटी रूपयांच्या व्याजाची परतफेड केलेली नाही, तर त्याच प्रमाणे जवळपास 500 लोकांच्या नावावर प्रत्येकी पाच लाख रू. प्रमाणे बेकायदेशीर कर्ज उचललेले आहे. या बाबतची तक्रार प्रकाश झुंबरलाल राका व दिपक प्रकाश राका यांनी वरीष्ठ कार्यालयाकडे केली होती.
  • सोबतच सन 2010-2011 ते सन 2018-2019 या नऊ आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी काही कोटी रूपये शाखा येणे फरक या सदराखाली दाखवून नऊ वर्षांच्या काळात रू.316 कोटी 56 लाख पेक्षा जास्त रक्कम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष आणि संचालक मंडळाने स्वतःच्या उपयोगासाठी वापरल्याचा आरोपही प्रकाश राका यांनी काही महिन्यापुर्वी केलेला होता.
  • या नऊ आर्थिक वर्षांमध्ये उचलल्या गेलेल्या या रकमेवर वरील दोषींनी 92 कोटी 18 लाख रू. पेक्षा जास्त देणे आवश्यक आहे. मात्र, यातील अर्ध्यावर व्याजाची रक्कम दोषी संचालकांनी अद्यापपर्यंत भरलेली नाही, तर गाजावाजा झाल्यानंतर आणि तक्रारी झाल्यानंतर गेल्या काही कालावधीमध्ये 317 कोटी रूपयांपैकी काही रक्कम दोषींनी बँकेत भरलेली आहे व आज रोजी यातील 55 कोटी 75 लाख रूपये भरणे असल्याचे देखील राका यांनी सहा महिन्यापुर्वी केलेल्या आरोपात म्हटलेले होते.
  • मे.डी.एम. बारसकर आणि कंपनी यांनी या बाबतचे लेखा परिक्षण करून दिनांक 22 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे, अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था लेखा परिक्षण विभाग पुणे आणि जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नागपूर यांचेकडे सादर केलेला होता.
  • बँकेचे एका संचालकाने या बाबत रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केलेली असून, त्याची देखील चौकशी झालेली आहे. या चौकशीमध्ये वर नमूद घोटाळ्या व्यतिरिक्त सुभाष सारडा, त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे कर्मचारी यांच्या नावाने चुकीच्या पद्धतीने आणि कोणतीही मालमत्ता गहाण न घेता, 39 व्यक्ती/ संस्थांच्या नावाने रु. 11679 लाख एवढी रक्कम कर्ज रूपाने खिरापतीप्रमाणे वाटली आहे. यावर देखील अद्याप सहकार खात्याने कोणतीही कारवाई केलेली नाही, असाही आरोप त्यावेळी प्रकाश राका यांनी केलेला होता.

राका यांनी या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली होती, पोलीसांनी त्यांचा जवाब देखील घेतलेला आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता. हा सर्व घोटाळा जवळपास 425 कोटी रूपयांचा असून, याची चौकशी ईडीने करावी, अशी मागणी देखील राका यांनी केलेली होती.

ह्या आरोपांचा धुराळा खाली बसतो न बसतो तोच आज अचानक रिझर्व्ह बँकेने सहकार आयुक्तांना आदेश देत बँकेवर तातडीने प्रशासक नेमण्यात यावा, असे आदेश दिले. त्यानंतर बँकेवर प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. देशमुख यांनी दुपारी दोनच्या सुमारास बँकेत दाखल होत सहकार आयुक्तांचे आदेश दाखवत कारभार स्विकारला.

Tagged