दिल्ली: कोरोनामुळे सगळे व्यापार आणि उद्योग ठप्प आहेत. हळूहळू सगळं सुरु होतंय असं वाटत असतानाच, अचानक एखादे शहर किंवा जिल्हा लॉक डाऊन होतो आणि पुन्हा स्थिती जैसे थे. देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नितीन गडकरींनी यावरच भाष्य केले आहे.
अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. आता अर्थव्यस्थेला पुन्हा पूर्वस्थितीत आणण्यासाठी सरकारनंही प्रयत्न सुरू केले आहेत. “आपल्या देशात एमएसएमई क्षेत्राचं मोठं योगदान आहे. तसंच येत्या काळात या क्षेत्रात ५ कोटी नवे रोजगार निर्माण होतील अशी अशा आहे,” असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ‘स्वावलंबन ई-समिट २०२०’ मध्ये गडकरी बोलत होते.
“देशाच्या विकासात एमएसएमई क्षेत्राचं मोठं योगदान आहे. जीडीपीच्या वाढीच्या दरात ३० टक्के उत्पन्न हे एमएसएमई क्षेत्राचं आहे. आतापर्यंत या क्षेत्रात आम्ही ११ कोटी रोजगार निर्माण केले,” अशी माहिती गडकरी यांनी दिली. “माझा विश्वास आहे आणि विचार आहे की येत्या पाच वर्षांमध्ये जीडीपीच्या वाढीचा दरातील एमएसएमई क्षेत्राचं उत्पन्न ३० टक्क्यांवरून ५० टक्के करू आणि निर्यातही ४८ टक्क्यांवरून वाढवून ६० टक्के करत ५ कोटी नवे रोजगारही निर्माण करू,” असंही ते म्हणाले.