त्रस्त पोलीस अधिकार्याची पोलीस अधीक्षकांकडे धाव
पैठण : मोठ्या आशेने ऊस उत्पादक सभासदांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळांनी खाजगी प्रायव्हेट कंपनीला चालविण्यासाठी दिलेल्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात ऊस उत्पादक व कामगारांचे हित जोपासणे ऐवजी येथील चेअरमन व संचालक मंडळामध्ये आपली पोळी भाजून घेण्यासाठी पडद्याआड माना-पानाचा तमाशा सुरू झाला आहे. मात्र यात पोलीस भरडले जात असून पोलीसांचा व कायद्याचा गैरवापर करण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे एमआयडीसी ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे धाव घेतली आहे.
या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा
तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या हितासाठी उभारलेल्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळामध्ये अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीतून मिटींगचे प्रोसिडिंग बूक पळवापळवीचे प्रकार घडत असल्याने कारखान्याच्या विद्यमान दहा संचालकाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात चेअरमन तुषार शिसोदे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर माजी चेअरमन आप्पासाहेब पाटील, माजी आमदार संजय वाघचौरे, व्हाईस चेअरमन भास्करराव राऊत, अण्णासाहेब कोल्हे, ज्ञानेश्वर ओटे, विजय गोरे, प्रकाश क्षीरसागर, आसाराम शिंदे, शिवाजी घोडके, अहिल्याबाई झारगड यांनी चेअरमन शिसोदे यांच्या हुकूमशाहीला कंटाळून कारखान्यांमधील भंगार चोरी, बेकायदेशीर साखर विक्री, प्रभारी कार्यकारी संचालकाची नेमणूक, व्हाईस चेअरमनची निवड, खोटी संचालक मंडळाची मासिक सभा दाखवत कारखाना चालविण्यासाठी देण्यात आलेल्या भाड्यापोटी मिळणारे कमिशनमध्ये गौडबंगाल करणार्या व संचालकाला अमान्य असणार्या चेअरमन शिसोदे यांची तात्काळ चौकशी करून प्रादेशिक साखर सहसंचालक औरंगाबाद यांनी विद्यमान संचालकाची बैठक आयोजित करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये या संचालकांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
या बैठकीत खरे व्हाईस चेअरमन व चेअरमन कोण आहे हे स्पष्ट होणार आहे. या कारखान्याच्या संचालक मंडळाचे अंतर्गत प्रश्नावरून नेहमीच येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात साध्या अर्जावर तक्रार दाखल करून सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रकरणात पोलीस ठाण्यात धाव घेतली जाते. त्यामुळे पोलीसांना यात कसलाच हस्तक्षेप करता येत नाही. परंतु वारंवार उपस्थित होणार्या कायदा व सुव्यवस्थेमुळे येथील सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील ह्या त्रस्त झाल्या आहेत. या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे धाव घेतली आहे. त्यामुळे शासकीय बंदोबस्त करावा की? सहकार क्षेत्रातले काम या प्रश्नामुळे येथील पोलिस कर्मचारी त्रस्त झाले आहे.