कोरोनाची लस कधी आपल्या पर्यंत पोहोचणार आणि कधी आपण पाहिल्यासारखे आयुष्य जगणार हा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे. आता कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. प्रत्येक खेड्यापाड्यात आणि गावात कोरोनाने कहर केला आहे. सर्व उद्योगधंदे आणि व्यापार ठप्प आहेत आणि त्याच कारणाने रोजगार सुद्धा मिळत नाही अशी परिस्थती आहे. याचेच उत्तर म्हणून, भारत सरकार देखील लस लवकरात लवकर बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे.
लस खरेदी, प्राधान्यक्रम आणि वितरण या संबंधी निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती बनवण्यात आली आहे. निती आयोगाचे डॉ. व्ही.के.पॉल यांच्या अध्यक्षतेखाली या तज्ज्ञ समितीची उद्या बुधवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. सध्याच्या घडीला लस हाच करोना व्हायरसच्या संकटातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. जगातील तीन ते चार लसी मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचल्या आहेत. सर्व काही सुरळीत झाले तर सप्टेंबरपासून लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते.
त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे लसीकरण कसे करायचे? त्याचा आराखडा निश्चित करण्यासंदर्भात बुधवारी टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक होणार आहे. ही समिती राज्य सरकार आणि लस उत्पादकांबरोबरही चर्चा करेल असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.